कोल्हापूर : मला गप्प बसवण्यासाठी पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, असा कोणीही गैरसमजू करुन घेऊ नका. मी लोकसभा निवडणूक लढवणारच आणि महायुतीचा उमेदवार म्हणून लढवणार आहे यात तीळ मात्र शंका नाही, असा थेट इशारा शिवसेना (Shivsena) नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी दिला. ते शिवसेनेच्या महाअधिवेशनासाठी कोल्हापूरमध्ये उपस्थित होते, त्यावेळी बोलत होते. (Former MP Shivajirao Adhalrao Patil warned from Shirur Lok Sabha Constituency.)
शिवाजीराव आढळराव पाटील यांची नुकतीच पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे गरिबांना स्वस्तात आणि परवडणारी घरे देण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण करणार आहे. मला लोकांमध्ये जाता येईल, जनतेची कामे करता येतील यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात अनेक दिवसांपासून मला एखादे पद द्यायचे असे होते.
पण याचा अर्थ मला गप्प बसविण्यासाठी हे पद दिले आहे असे कोणीही समजू नये. मी लोकसभा निवडणूक लढवणारच आणि महायुतीचा उमेदवार म्हणून लढवणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. शिरुर मतदारसंघावर महायुतीतील सर्वच पक्ष दावा करतात. मात्र खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षांपासून मी रात्रंदिवस काम करत आहे. अनेक विकास कामे केली आहेत. निवडून आलेला खासदार गेल्या पाच वर्षांपासून लोकांना दिसला नाही. मात्र लोकांसाठी खासदार नसून सुद्धा मीच काम करत होतो, असाही दावा त्यांनी केला.
शिरुरमध्ये शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा आढळराव पाटील हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत गेल्यानंतर शिरुर, सातारा, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच (NPC) लढवणार आहे, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे.
यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अमोल कोल्हे यांनाही पराभूत करणार असल्याचे आव्हान दिले आहे. अशात शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिरुरवरील दावा सोडण्यासाठीच झाली असल्याचे बोलले जात आहे. पण असा कोणीही गैरसमजू करुन घेऊ नका. मी लोकसभा निवडणूक लढवणारच आणि महायुतीचा उमेदवार म्हणून लढवणार आहे यात तीळ मात्र शंका नाही, असे त्यांनी सांगितले आहे.