Download App

गिरीश महाजनांनी उध्दव ठाकरेंनाही सोडलं नाही…

पुणे : उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) हातातून सगळं काही गेल्यानंतर उशिरा सुचलेलं शहाणपण आलं असल्याचं म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. गिरीश महाजन आज पुण्यातून पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाजन म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी एकाही उद्योजकाची भेट घेतलेली नाही. राज्यातील तरुणांच्या बेरोजगारासाठी उद्धव ठाकरेंनी एकदाही कोणत्या उद्योजकासाठी बैठक घेतल्याचं मला दाखवा, असं ते म्हणालेत.

तसेच ज्यावेळी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्या अडीच वर्षांच्या काळात ते कधीही घराबाहेर आलेले नाहीत. स्वत: काहीही करायचं नाही आणि आता प्रकल्प इकडे-तिकडे गेल्यानंतर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

उद्धव ठाकरे यांच्या हातात काही राहिलेलं नाही, सगळं काही हातातून निघून गेल्यानंतर ठाकरे यांना आता उशिरा सुचलेलं शहाणपण, या शब्दांत गिरीश महाजन यांनी टीका केलीय.

दरम्यान, पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले आहे. सध्या काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडी अंतर्गत गटबाजीमुळे सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत, तर अंतर्गत बंडाळीमुळेच काँग्रेसचे नेते बाहेर पडणार असल्याचं भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे.

राज्यातून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प बाहेर गेल्याने विरोधकांकडून सत्ताधारी भाजपला धारेवर धरलं होतं. प्रकल्प परराज्यात गेल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलाच संघर्ष पेटल्याचं दिसून आलं होतं.

Tags

follow us