कोणतेही संशोधन हे कार्यशाळा व शैक्षणिक संकुला पुरते मर्यादित न राहता त्याचा समाजासाठी, उद्योगासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग झाला पाहिजे. सरकारने देखील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान सहा ते सात टक्के निधी हा संशोधनासाठी उपलब्ध करून दिला, तर त्यातील वाढता सहभाग, गुणवत्ता आणि परिणामकारकता ही विकसनशील भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत करण्यासाठी उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन पद्मश्री व इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे “इनोव्हेशन व उद्योजकता उत्कृष्टता केंद्र” चे (Center of Innovation and Entrepreneurial Excellence – CIEE) चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पद्मश्री उद्योजक प्रतापराव पवार, एआयसीटीइ चे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन डॉ. श्रीकांत पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संजय सोनवणे, महाराष्ट्र औद्योगिक परिषदचे उपाध्यक्ष सचिन इटकर, पीसीयू संशोधन व विकास विभाग प्रमुख डॉ. भारत काले, आंतरराष्ट्रीय संबंध व इनोव्हेशन विभाग प्रमुख डॉ. एस. बी. देवसरकर, विविध नामांकित संशोधन संस्था मधील प्रतिनिधी, उद्योग प्रतिनिधी आदींसह पीसीयू अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख तसेच आयआयसीचे सदस्य उपस्थित होते. या कॉन्क्लेव्हमध्ये सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि १५ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले.
सोलापुरात ऑपरेशन परिवर्तन ते पुणेकरांना शिस्त; कॅप्टनचा ‘गेम’ ओव्हर सातपुते करणार
पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, पीसीयू आयोजित या कॉन्क्लेव्हमध्ये संशोधक विद्यार्थ्यांच्या नव संकल्पनांना चालना देण्यासाठी देशभरातील नामांकित शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, उद्योग तज्ज्ञ व शासकीय अधिकारी यांनी सहभाग घेऊन नव संकल्पना त्यांचा विकास, स्टार्टअप, संशोधनाचे व्यावसायिकीकरण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था उभारणी या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे, सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, आयसीटी मुंबई, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी या संस्थांच्या सहभागामुळे आणि देशातील फोर्ब्स मार्शल या आघाडीच्या उद्योग समूहांच्या प्रतिनिधींच्या सहभागामुळे पीसीयू ला देशातील अग्रगण्य नवोन्मेष केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्यास मोठी चालना मिळाली आहे. पीसीयू केवळ नोकरी शोधणारे विद्यार्थी तयार करत नाही, तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक घडवत आहे. पद्मश्री प्रतापराव पवार यांनी जागतिक सहकार्य व आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला.
पीसीयू कुलपती व पीसीइटी विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे यांनी सर्व सहभागी प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. सचिन इटकर यांच्या उपस्थितीत ग्रामीण उद्योजकतेस चालना देणारा सामंजस्य करार करण्यात आला. ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देऊन १००० उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट, शेती मध्ये एआय चा वापर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची दृष्टीने विचार मांडण्यात आले. डॉ. एस. बी. देवसरकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
इतर चर्चा सत्रांमध्ये एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा, सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे संचालक डॉ. सुरेंद्र राठोड, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, महाराष्ट्र शासन इनोवेशन सोसायटी सीईओ डॉ. श्रीकांत पाटील तसेच डॉ. विलास खरचे (कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी), डॉ. दयानंद म्हस्के (कुलगुरू, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, क्लस्टर युनिव्हर्सिटी, सातारा), डॉ. पंडित विद्यासागर (माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), डॉ. दत्ता कुवळेकर (संचालक, फोर्ब्स मार्शल), डॉ. सुधाकर आगरकर (टाटा मूलभूत संशोधन संस्था), डॉ. दिनेश आमलनेरकर (माजी संचालक, सीएमइटी), डॉ. गौरंग गांधी (मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टेमियस प्रा. लि.) आदींनी विविध चर्चासत्रात सहभाग घेतला.
