Download App

IND vs PAK : भारत-पाक सामन्यावर बहिष्कार! निषेधाच्या ट्विट्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

IND vs PAK World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची दोन्ही देशांतील क्रिकेट फॅन आतुरतेने वाट पाहत होते. सोशल मीडियावरही या सामन्याचीच चर्चा होती. मात्र, त्यात काही नकाराचे सूरही आळवले जात होते. काल शुक्रवार दिवसभर ‘#BoycottIndoPakMatch’ हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. असं नेमकं काय झालं की सामन्याचा उत्साह असतानाच हा ट्रेंड सुरू झाला. क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादातील सहभागामुळे सोशल मीडियावर सामन्यावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. ज्यामुळे हा ट्रेंड सुरू झाला. याआधी 13 सप्टेंबर रोजी काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कर्नल, मेजर आणि पोलीस उपनिरीक्षक शहीद झाले.

World Cup 2023 : भारत-पाक सामन्यात ‘बॉलिवूड’चा जलवा; खास सिंगर्स करणार परफॉर्मन्स!

यानंतर विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात येणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंचे स्वागत केले जात असतानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सहाजिकच काही जणांच्या मनात संतापाची तिडीक उठली. ज्या पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. हे अगदी स्पष्ट दिसत असतानाही त्यांच्या खेळाडूंचे असे स्वागत करणे, पाकिस्तान संघाबरोबर क्रिकेट खेळण्याची गरजच काय?, असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले. त्याचा परिणाम म्हणून काल दिवसभरात हजारो ट्विट्स केले गेले. त्यामुळे ‘#BoycottIndoPakMatch’ हा हॅशटॅग काही काळ ट्रेंडमध्ये होता.

सामन्याचा उत्साह शिगेला

या निषेधाच्या आवाजाचा सामन्यावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. कारण, लाखो करोडो चाहत्यांनी सामना पाहण्याची तयारी केली आहे. स्टेडियमरवरही तुडुंब गर्दी होत आहे. बीसीसीआयकडूनही खास व्यवस्था केली जात आहे. सामन्याच्या दीड तास आधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक येथे येऊन सामन्याचा उत्साह वाढविणार आहेत. येथे त्यांच्या जादूई आवाजाचा कार्यक्रम होणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी रेल्वेने खास रेल्वेचीही व्यवस्था केली आहे. स्टेडियममधील प्रेक्षकांना मोफत पाणी बॉटल देण्यात येणार आहेत. याचा सगळा खर्च बीसीसीआय करणार आहे. इतकेच नाही तर देशभरात या सामन्याचा उत्साह दिसून येत आहे.

भारत-पाकिस्तान पहिल्यांदा कधी भिडले ?

भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासावर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये पहिला सामना 1952 मध्ये झाला होता. हा कसोटी सामना होता. पहिला एकदिवसीय सामना 1978 मध्ये क्वेटा येथे खेळला गेला होता. भारताने पहिली कसोटी आणि वनडे दोन्ही जिंकले. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध पहिली कसोटी खेळली. दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 372 धावा केल्या होत्या. यादरम्यान विजय हजारेने 76 धावा केल्या होत्या. विजय मांजरेकरने 23 धावांचे योगदान दिले होते. हेमू अधिकारीने नाबाद 81 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 150 आणि दुसऱ्या डावात 152 धावा करत सर्वबाद झाला.

Tags

follow us