Manoj Jarange Hunger Strike Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Patil) यांनी आंतरवाली सराटीतून मराठा समाजाला मुंबई आंदोलनाची हाक दिली. राज्यव्यापी बैठकीनंतर त्यांनी समाजाला मोठं आवाहन केलं आहे. त्यांनी मुंबईत जाण्याचा आणि मुक्कामाच्या ठिकाणाची माहिती दिली. त्याचवेळी मराठा आरक्षणावर मार्गदर्शन करताना त्यांना हुंदका आवरता आला नाही. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळले. जरांगे पाटील समाजाशी संवाद साधताना रडले. त्यावेळी वातावरण शांत झालं होतं. अनेक उपस्थितांचे मन गहिवरले. अनेकांचे डोळे पाणावले असं वातावरण निर्माण झालं होतं.
अश्रू अनावर
हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज स्वीकारले जात नाही. मराठ्यांची अडवणूक होत असल्याची खंत जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. मराठा समाजाने सगळ्यांना मोठं केलं. पण आज तेच लोकं समाजातील लेकीबाळी आणि लेकराबाळांना मोठं होऊ देत नसल्याचं ते म्हणाले. समाजाने आता तरी जागं व्हावे. नेता हा तुमचा बाप नाही, तर समाज हा तुमचा बाप आहे. आपल्या मुलांना जपा, लेकरांना मोठं करा, पक्षाला आणि नेत्याला मोठं करून लेकराबाळांचे मुडदे पाडू नका, समाज मोठा असतो, नेता मोठा नसतो हे समजून घ्या, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
मनोज जरांगेंची मोठी घोषणा; आंदोलकांचा मोर्चा घेऊन मुंबईला जाणार
आपले सोन्यासारखं लेकरं आत्महत्या करत आहेत. तुम्ही कुणाचा उदोउदो करता. पक्ष आणि नेत्यांचा करता का? आमचा समाज इतका नामर्द कसा झाला? असा थेट प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. हातातोंडाला आलेला घास हे नेते खाऊ देत नाही. मी जीव या लेकराबाळांसाठी जाळतोय असे म्हणताना जरांगेंचा कंठ दाटून आला. त्यांना अश्रू अनावर झाले. जरांगे समाजासमोर रडले. त्यांनी समाजाला या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं.
…तर महाराष्ट्र बंद करा
मुंबईत आंदोलनाची हाक देताना मोर्चा शांततेत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या मोर्चात कुणीही हुल्लडबाजी न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. समाजाची शिस्त दिसून देण्याचं आवाहन त्यांनी केलं. कुणालाही त्रास होईल असं वागू नये असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. तर त्याचवेळी जर कुणाचं रक्त सांडलं तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला. मी काही संत नाही असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
