Download App

पडद्यामागचं राजकारण! भाजपात फडणवीस विरूद्ध सगळे; नेमकं काय घडतंय

  • Written By: Last Updated:

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहेत. सर्वत्र निवडणुकीची चर्चा होत असून, प्रत्येकजण आपापल्या परीने निवडणुकीची गणिते मांडत आहे. पण भाजपच्या गोटात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरूद्ध सगळे अशी एक फळी तयार झाल्याचे चित्र दिसतंय. एखाद्या मुख्यमंत्र्याला एकदम उपमुख्यमंत्री करणे, ही राजकारणातील दुर्मिळ घटना होती. तिथूनच फडणवीसांचा वळणावळणाचा आव्हानात्मक राजकीय प्रवास आजपर्यंत सुरू आहे. अशा नेमक्या घटना काय घडल्या आणि फडणवीस विरूद्ध सगळे नेते अशी परिस्थिती निर्माण झाली याचाच घेतलेला हा आढावा.

निवडणूक जाहिरातीसाठी पैसे खर्च करण्यात भाजप नंबर वन! तीन महिन्यात 38.7 कोटी खर्च

अन् अनेक नेते दुरावण्यास झाली सुरूवात

फडणवीसांपासून भाजपातील नेते दुरावण्याची सुरूवात साधारण 2014 नंतर झाली. कारण महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षात मुंडे-महाजन युगानंतर म्हणजेच 2014 नंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला. याच काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींच्या पूर्ण पाठिंब्यामुळे फडणवीसांना महाराष्ट्राची पूर्ण सत्ता मिळण्यास मदत झाली होती. या काळात सध्याच्या ठाकरे गटाची काहीशी कुरकुर होतीच पण फडणवीसांनी ती कुरकुर मोठ्या कौशल्याने हाताळली होती. पण ही परिस्थिती ठिकठाक करत असतानाच दुसरीकडे फडणवीसांपासून अनेक नेतेमंडळी दुरावत गेले.

राज्याच्या राजकारणात काहीशा पिछाडीवर गेलेल्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) लोकसभेचं तिकीट मिळणं, खडसेंच्या सुनेलाही उमेदवारी देणं आणि नंतर थेट नाथाभाऊंची ‘घरवापसी’ या घटनांमागे मोठे राजकारण दडले आहे. गेल्या काही दिवसांतील फडणवीस-महाजनांच्या वक्तव्यांवरूनही आपल्याला याची कल्पना येऊ शकते. त्यात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही खारीचा वाटा असल्याचे बोलले जात आहे.

सुप्रिया सुळेंसाठी पवारांनी गुंडाळलं जुनं वैर; थोपटेंनंतर काकडे अन् भाजप नेते चंद्रराव तावरेंसोबत खलबतं

खडसे, पंकजा अन् तावडे दुरावले

आता आपण फडणवीसांपासून कोण कोण दुरावले याकडे बघितल्यास यात प्रामुख्याने तीन नावे समोर येतात. यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे या तीन नेत्यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. गोपीनाथ मुंडेंच्या दुर्दैवी निधनानंतर ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच होणार’, असा संदेश देणारे त्यावेळचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे फडणवीसांचे पक्षांतर्गत पहिले विरोधक ठरले. त्याचबरोबर ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मीच’ असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे या त्यांच्या पक्षांतर्गत दुसऱ्या विरोधक ठरल्या. तर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मुंबई भाजपची धुरा व्यवस्थितपणे सांभाळणारे विनोद तावडे हेसुद्धा फडणवीसांचे स्पर्धक ठरत होते. तसे बघितले गेल्यास खडसे आणि तावडे फडणवीसांना सिनियर पण केवळ आणि केवळ मोदींच्या पाठिंब्यामुळे आणि राजकीय चातुर्याच्या जोरावर फडणवीस या तिन्ही नेत्यांना भारी पडले.

सुपर बाईक्स, अलिशान कार अन्…; भाजपच्या श्रीमंत मंत्र्यानं प्रतिज्ञापत्रकात दाखवलं माफक उत्पन्न

चिक्की घोटाळा ते पंकजांना तिकीट

लोकसभेच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर भाजपाकडून कुणाकुणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. यासाठी फडणवीसांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत खलबतंदेखील झाली. त्यात पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी देण्यात आली. पक्षांतर्गत राजकारणात फडणवीसांमुळे आपल्याला डावललं जात होतं असे पंकजा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी वेळोवेळी बोलून दाखवत होत्या. त्यात फडणवीसांच्या कार्यकाळात राज्यात चिक्की घोटाळाही जोरदार गाजला होता. तेव्हापासून फडणवीस आणि पंकजांमध्ये दरी निर्माण झाल्याचे बोलले जाते. त्यानंतरच्या काळात पंकजांसोबत पक्षात काय काय घडले हे सर्वश्रृत आहे. पण आता पक्षाकडून वेळोवेळी डावलण्यात येणाऱ्या पंकजांनाच बीडमधून पक्षाने उमेदवारी दिल्याने फडणवीस पक्षात साईडलाईन तर होत नाहीयेत ना? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.

खडसेंचा विरोध ते पुन्हा घरवापसी

2014 मध्ये फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील कटुता निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून दोघांमध्ये तणाव आहे. भाजप-शिवसेना युतीच्या विजयानंतर खडसे हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असल्याने ते मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांची निवड केली. तर, खडसेंना महसूल आणि कृषी यांसारखी महत्त्वाची खाती दिली. मात्र, काही वर्षांतच खडसे यांच्यावर भोसरीतील भुखंड घोटाळ्याचे आरोप करण्यात आले.

पंकजांचा चिक्की घोटाळा ज्या पद्धतीने राज्यभर गाजला त्याचप्रमाणे फडणवीसांचे पहिले विरोधक एकनाथ खडसेंचा भोसरी येथील भुखंड घोटाळा देखील जोरदार गाजला होता. या घोटाळ्यात काय काय घडलं हे सर्वांनाच माहिती आहे. त्यात आता खडसेंनी अचानक रिव्हर्स गिअर टाकत पुन्हा भाजपात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे फडणवीस-महाजनांसकट अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. त्यात खडसेंच्या सुनेलाही लोकसभेचं तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने पंकजांना मिळालेली उमेदवारी आणि खडसेंची पुन्हा भाजपात वापसी बघता ‘पक्षांतर्गत फडणवीस विरोधकांची एकी’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राज ठाकरे खिशात… महायुतीने डझनभर उमेदवारांचं गणित सोडवलं

फडणवीस आणि खडसे यांच्यात परस्पर सलोखा कसा साधायचा हे भाजपच्या हायकमांडसाठीही अवघड काम आहे. फडणवीसांसह प्रदेश भाजपचे नेतृत्व खडसेंच्या पुनरागमनासाठी राजी नसल्याचे बोलले जात आहे. तर, केंद्रीय नेतृत्वाने निवडणुकांपूर्वी राज्यात बदल हवा असल्याचे अधोरेखित करत स्वतः खडसेंशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. पण खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुने वैर असल्याचा विसर बहुधा पक्षाला पडला असून, खडसेंच्या घरवापसीमुळे फडणवीस नाराज होण्याची शक्यता आहे.

तावडेंना शाहंचा फुल्ल पाठिंबा

कधीकाळी विनोद तावडे राज्याच्या राजकारणात सक्रीय होते. पण कालांतराने तावडेंना देशपातळीवरील पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली. सध्या तावडेंकडे पक्षातील एक ‘पॉवर’फुल नेते म्हणून बघितले जाते. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा तावडेंना पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे खडसेंची घरवापसी, पंकजांना उमेदवारी यामागे तावडेंचे राजकारण असल्याची चर्चा पक्षातच दबक्या आवाजात सुरू आहे.

follow us