Ajit Pawar Inspecting Farmer Damage In Flood : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी (25 सप्टेंबर) पहाटेपासूनच अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा सुरू केला. पिंपळगाव घाट येथून पाहणीची सुरुवात करत त्यांनी हिंगणी खुर्द, खोकरमोहा, येवलवाडी अशा गावांना भेट दिली. त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघातील पिकांचे आणि पूरग्रस्त भागांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे.
दौऱ्यादरम्यान काही पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) निवेदन दिलं. मात्र, एका कार्यकर्त्याने काही महसूल मंडळांचा पंचनाम्यात समावेश व्हावा, अशी मागणी केली असता अजित पवारांनी त्याला चांगलंच सुनावलं. ‘आम्ही कुणालाही वगळत नाही, कलेक्टर आले आहेत (Heavy Rain) ते काम बघतील,’ असे सांगत त्यांनी कार्यकर्त्याला झापल्याची माहिती मिळाली.
अजित पवार यांनी दौऱ्यात हवामान खात्याच्या इशाऱ्याचा उल्लेख करत सांगितलं की, 27 ते 30 सप्टेंबर या चार दिवसांत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यंत्रणा सतत काम करत ( Damage In Flood) आहे. गरज भासल्यास एअरलिफ्ट करून बचावकार्य केले जात आहे. एनडीआरएफ व लष्कराच्या टीम्सही कार्यरत आहेत. अडचणीत सापडलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी प्रशासन झटत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच, उद्यापासून पंचनामे अधिक वेगाने पार पाडण्याचे आदेशही (Beed) त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जे काही करावं लागेल ते करा. पंचनाम्यानंतर खरी नुकसानाची आकडेवारी समोर येईल. किती हेक्टर क्षेत्र बाधित झालं आणि किती नुकसान झालं, हे स्पष्ट होईल. केंद्र सरकारकडूनही मदतीची अपेक्षा आहे, असंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे सर्व खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य आणि मंत्री आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. ही माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.