प्रतिनिधी मुंबई : प्रशांत गोडसे
Mahavikas Aghadi Morcha : राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजातील अनियमिततेविरोधात आज मुंबईत विरोधी पक्षांकडून ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येत आहे. मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि डावे पक्ष अशा अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येत हा मोर्चा आयोजित केला आहे. मोर्चाची सुरुवात फॅशन स्ट्रीटवरून होणार असून तो महापालिका मुख्यालयापर्यंत जाऊन मोर्च्याची सांगता होणार. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या दुटप्पी भूमिकेविरोधात भाजपाकडून मूक आंदोलन केले जाणार आहे.
मतदार याद्यांतील गोंधळाविरोधात विरोधक आक्रमक
मतदार याद्यांमध्ये मृत व्यक्तींची नावे, डुप्लिकेट नावे, बोगस मतदार अशा गंभीर तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहे . “सदर यादिच्या निवडणुका घेतल्या तर लोकशाही धोक्यात येईल,” असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. याद्यांतील घोळाबाबत राज्यभरातून कायदेशीर याचिका दाखल करण्याची तयारीही सुरू आहे.
परवानगी नाकारली; मोर्चा तरीही मार्गस्थ
मोर्चासाठी सर्व तयारी पूर्ण असून पोलीस बंदोबस्त, मार्ग आणि वेळ निश्चित झाले होते. पण शेवटच्या क्षणी पोलिसांनी परवानगी (Mahavikas Aghadi Morcha) नाकारल्याचे समोर येत आहे. तरीही मोर्चा परवानगीशिवाय मार्गस्थ होणार आहे. अनेक कार्यकर्ते चर्चगेट परिसरात जमण्यास सुरवात झाली आहे. “हा मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात नसून मतदारांच्या हक्कांसाठी आहे,” असे विरोधकांचे म्हणणे आहे.
राजकीय वजन वाढले ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने या आंदोलनाचे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. “जर मतदार यादीच चुकीची असेल तर नागरिकांचा विश्वास कुठे राहणार? आयोगाने तातडीने सुधारणा कराव्यात,” अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपाचे मूक आंदोलन
या मोर्चावर भाजपने टीका करत, “हे अपयशी लोकांचा असंतोष आहे, यातून काहीही निष्पन्न होणार नाही,” असा दावा भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राज ठाकरे यांना उद्देशून केला आहे “मोर्चाला लोकलने नव्हे तर मेट्रोने जावं,” असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला आहे.
मोठी बातमी, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल
तर महाविकास आघाडीच्या दुटप्पी भूमिकेविरोधात भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गिरगांव येथे 1 वाजता मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
