Bus Accident at Jalna Ambad Depo : जालना जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या अंबड येथील आगाराची सिल्लोडला जाणारी बस फलाट क्रमांक १ वर थांबवत असताना ती फलाट क्रमांक ३ व ४ वर शिरली. (Jalna) बस चालकाकडून ब्रेक न लागल्याने बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट उभा असलेल्या प्रवाशांच्या अंगावर गेली. या घटनेमध्ये दोघजण ठार झाले तर पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
संतापजनक! कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर हल्ला; चालकालाही काळे फासले
खलीलउल्ला अजीमुल्लाह शेख (रा.जुना जालना), मुरलीधर आनंदराव काळे (५० रा.शेवगा) या दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमींपैकी २ दोघांना अंबड ग्रामीण रुग्णालय व इतरांना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याची माहिती आगार प्रमुख रणवीर कोळपे यांनी दिली.
अंबड आगारातून सिल्लोडला जाण्यासाठी निघणाऱ्या बसचे (क्र. एम. एच.२० – बी. एल. १६०६) चालक व्ही. एस. राठोड (३६) हे बसला दुपारी फलाट क्रमांक १ वर लावत असतांना त्यांना ब्रेक लागले नाही. त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस सरळ फलाट क्रमांक ३ व ४ वर शिरली. यावेळी बस स्थानकात मोठी गर्दीही होती. या घटनेत अनिता बंडू गुंजाळ (३०, रा. अंबड), पार्वती धोंडीराम नवघरे (३०, रा. जामदाये ता.हिंगोली), पूजा कडुबा धोत्रे (४), हिना अलीम शेख (३०), रेहाना शेख अलीम (१, दोघेही रा.धाकलगाव ता. अंबड) अशी जखमींची नावे आहेत.
अपघातग्रस्त बसची तपासणी
अपघातग्रस्त बसची तपासणी जालना येथील यंत्र अभियंता यांच्याकडून करण्यात आली. तपासणीनंतर बसमध्ये कसलाही यांत्रिक बिघाड झाला नसल्याचं सांगण्यात आलं. अपघातातील जखमींना तातडीने रुग्ण्यालयात दाखल करण्यात आलं होत. परंतु, त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. बाकी उपचार घेत असलेल्यांना महामंडळाच्या नियमानुसार वैद्यकीय मदत पुरवली जाईल. -रणवीर कोळपे, आगारप्रमुख, अंबड