Download App

ठाकरेंच्या राजीनाम्यावरील पृथ्वीराज चव्हाणांचं भाकित अखेर खरं ठरलं!

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; भाजपचे 9 तर शिंदे गटाचे ‘इतके’ मंत्री घेणार शपथ

हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर देखील भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणलं असतं. पण  ठाकरेंनी राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा प्रश्नच नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.  राजीनामा देणं कायदेशीररित्या चुकलं असेलही पण ज्यांना शिवसेनेने सर्व काही दिलं त्यांनी माझ्यावर अविश्वास आणावा हे मला मान्य नव्हतं, असे ठाकरे म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार थोड्या दिवसांचं; सर्वोच्च निकालानंतर अनिल परबांनी सांगितली रणनीती

यानंतर आता काँग्रसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा होते आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच पृथ्वीराज चव्हाणांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीत राजीनामा देऊन मोठी चूक केली. त्यांनी विधीमंडळात जाऊन भाषण करायला हवं होतं, असे ते म्हणाले होते. तसेच ठाकरेंनी आपली बाजू मांडायला हवी होती. ठाकरेंनी त्यांच्या पुढची परिस्थिती विधानभवनात मांडली असती तर त्यांची नोंद विधीमंडळाच्या कामकाजात झाली असती. त्यांच भाषण रेकॉर्डवर राहिलं असंत, असे चव्हाण म्हणाले होते. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना हाच मुद्दा मांडला व उद्धव ठाकरेंना परत मुख्यमंत्री होता येणार नाही कारण त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला होता, असे म्हटले आहे.

 

Tags

follow us