Harshvardhan Sapkal and Uddhav Thackeray Meet : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचं चित्र आहे. राजकीय पक्ष युती आणि आघाड्यांचं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Thackeray) महाविकास आघाडीमध्ये हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ थेट शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
या भेटीनंतर सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आमच्यात एक चांगली चर्चा झाली. आपला महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे, यावर आम्ही चर्चा केली. महाराष्ट्र धर्म जगला तर देश जगेल, पण आज भाजप धर्म आणि देश बुडवाला आला आहे, अशी टीका सपकाळ यांनी यावेळी केली.
मी राहूल गांधी यांच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. तेच पुस्तक मी उद्धव ठाकरे यांना भेट दिलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढाव्या याबाबत दोन्ही पक्षाच्या काही भूमिका आहेत. आमचा निर्णय सविनय सांगितला जाईल. निवडणुकीची घोषणा झाल्यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल. आमची चर्चा ही महाराष्ट्र वाचविण्यासाठी झाली. जे कोणी सोबत येतील त्यांना घेण्याचा आमचा विचार आहे, अशी भूमिकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली.
लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलो आहोत. जोपर्यंत हा मुद्दा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीत लढायच्या की एकत्र लढायच्या? याचा निर्णय निवडणुका जाहीर झाल्यावर घेतला जाईल. स्थानिक पातळीवर चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असंही सपकाळ यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सपकाळ यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गट नेमकी काय भूमिका घेणार? याकडं सर्वांचेच लक्ष लागलं आहे.