अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील तपनेश्वर भागात (Jamkhed) राहणाऱ्या आणि कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने दोन दिवसांपूर्वी जामखेडच्या खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतरर येथील भाजपशी निगडीत असलेल्या संदीप गायकवाड याने दिपाली पाटील हिला सातत्याने लग्नाचा तगादा लावल्यानेच दिपालीने आत्महत्या केल्याचा आरोप तिची आई दुर्गा गायकवाड यांनी केला आहे. तशी फिर्याद त्यांनी दिली आहे. त्यावरुन, आता राजकीय वातावरणही तापलं आहे.
या सगळ्या प्रकारानंतर कला केंद्राचे मालक अरविंद जाधव यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दिपाली अत्यंत गरीब होती, तिने तीन महिन्यांपूर्वीच कला केंद्र सोडलं होतं, असं ते म्हणाले आहेत. याप्रकरणातील आरोपी संदीप गायकवाडची पत्नी लता गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून प्रभाग 5 ब मधून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आहे. संदीप गायकवाड हा स्वतः विवाहित असताना तो दिपालीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे दिपालीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचारात रोहित पवार यांनी भाजपवर टीका करताना नगरपरिषद निवडणुकीत भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली असल्याचं वारंवार म्हटलं होतं. त्यातच आता त्यांच्याच उमेदवाराच्या पतीने दबाव टाकल्याने एका नर्तिकेना आत्महत्या केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. रोहित पवारांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जामखेडच्या कलाकेंद्रातील नर्तकी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक.
दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणावर राज्यातील इतरही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, हे घटना दुर्दैवी असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सोबतच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं राजकीय नेत्यांनी म्हटलं आहे. दिपाली पाटील ही मुळची कल्याण येथील रहिवाशी होती, तिचा विवाह झाला असून तिला दोन मुलं होती. मात्र, नवऱ्यासोबत मतभेद झाल्याने ती स्वतंत्र राहत होती, तिचे दोन्ही मुलं हे कल्याण येथे आजीसोबत राहत आहेत. तर घरातील आर्थिक परिस्थिती बेताच्या असल्याने तिने कला केंद्रात काम करणं पत्करलं होतं.
काही दिवसांपासून ती संदीप गायकवाडच्या संपर्कात होती आणि संदीप गायकवाड हा तिला लग्नासाठी दबाव टाकत होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ती बाजारात जाऊन येते असे सांगून बाहेर पडली. परंतु अनेक तास उलटूनही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचं सांगितलं. मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रुम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचं आढळलं.
दिपाली ज्यावेळेला लॉजवर गेली होती त्या वेळेला संदीप देखील त्या ठिकाणी आला होता हे सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली आहे, दरम्यान संदीप गायकवाड हा जरी सध्या भाजपमध्ये असला तरी तो यापूर्वी राष्ट्रवादी पक्षात होता. तो आणि त्याची पत्नी लता गायकवाड हे दोघेही माजी नगरसेवक आहेत. संदीप गायकवाड याच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून तो याच निवडणुकीत भाजपमध्ये गेला. मात्र, दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणात त्याचं नाव आलं आणि त्याच्यासह भाजप पक्षालाही टिकेचं धनी व्हावं लागलं.
दिपाली पाटील ही अतिशय गरीब कुटुंबातील असून उदरनिर्वाह भागवण्यासाठी जामखेड येथील कला केंद्रावर काम करत होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून तिने घुंगरू हे कला केंद्र सोडून दिल्याचं घुंगरू कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी सांगितलं. दिपाली पाटील या मूळच्या कल्याणमधील आहेत त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे दोन-तीन महिन्यांपूर्वी आमच्या कला केंद्रात आल्या होत्या. सध्या त्या आमच्याकडे नव्हत्या. दिपाली पाटील परिस्थितीने खूप गरीब होत्या, असंही जाधव यांनी सांगितलं.
