बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरच्या (Bhima Shankar) विकासासाठी तब्बल 288 कोटी 17 लाख रुपयांच्या विकास आऱाखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली आहे. मात्र, याच विकास आराखड्यासाठीच्या बैठकीनंतर भीमाशंकर नेमकं खेडचं की आंबेगावचं असा राजकीय संघर्ष उफाळून आलाय आणि त्याला कारण ठरलंय खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी घेतलेली भूमिका. भीमाशंकर विकास आराखड्यात आंबेगावचा उल्लेख जोडण्यास खेडचं आमदार बाबाजी काळे यांनी संमती दिल्याचा आरोप होतोय.
दिलीप वळसे पाटलांच्या विनंतीला मान देऊन बाबाजी काळेंनी मुख्यमंत्र्यांपुढे आंबेगावचा उल्लेख जोडण्याचे मान्य केलं. मात्र, भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यातच असल्याची भूमिका घेत माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आक्रमक झालेत..आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच जुंपलीय. भीमाशंकर परिसरातील गावांना सोय़ीसुविधा आंबेगाव तालुक्यातून पुरवल्या जात असल्यानं भीमाशंकरच्य़ा पुढे आंबेगाव तालुका असा उल्लेख जोडण्याची मागणी आहे.परंतु भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्यात येतं.
काय बदल होणार?
भीमाशंकर विकास आराखड्यासाठी एकूण 288 कोटी 17 लाख रुपये मंजुर करण्यात आलेत. या पैशांतून कुंभमेळ्यापूर्वी भीमाशंकर परिसराचा कायापालट करण्यासाठी रस्ते, पार्किंग, रोप-वे, पर्यटन सुविधा आणि मूलभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. मे 2027 पर्यंत विकास आराखड्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे भीमाशंकर विकास आराखड्यातून तालुक्यांचा विकास करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून केला जात आहे.
एकीकडं कोट्यवधींचा विकास आराखडा मंजूर होऊन भीमाशंकर परिसराचा कायापालट होणार असताना दुसरीकडे मंदिराच्या हद्दीवरून सुरू झालेला हा वाद राजकीय अस्मितेचा मुद्दा बनलाय. त्यामुळे भीमाशंकर नेमकं खेडचं की आंबेगावचं हा वाद आता आणखी चिघळणार का? या राजकीय वादाचे परिणाम भीमाशंकरच्या विकास आराखड्यावर होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
