मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने सोमवारी (दि.२०)रोजी आणखी ३४६ कोटी रुपयांची मदत मंजूर केली. विभागातील ३ लाख ५८ हजार बाधित शेतकऱ्यांना ही मदत वाटप केली जाणार आहे. (Rain) याआधी राज्य सरकारने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी २८२९ कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सोमवारी एकूण ६४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यात मराठवाड्यासाठीच्या ३४६ कोटी रुपयांचा समावेश आहे. यंदा मराठवाड्यातील राज्यातील इतरही अनेक जिल्ह्यांत वेळोवेळी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. लाखो हेक्टरवरील खरिपाची पिके वाया गेली. विशेषतः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सातत्याने अतिवृष्टी झाल्याने येथील शेतकरी, आर्थिक संकटात सापडला आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा, पुढील 4 दिवस कुठं काय असणार स्थिती?
राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा करण्यात आली. टप्प्याटप्प्याने अतिवृष्टीग्रस्तांसाठी निधी मंजूर केला जात आहे. ऑगस्ट महिन्यापासून कालपर्यंत मराठवाड्यासाठी एकूण २८२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सध्या त्या मदतीचे वाटप सुरू आहे. त्यात सोमवारी राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर विभागासाठी आणखी ३४६ कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे आतापर्यंत मराठवाड्याला एकूण ३१७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
सरकारने सोमवारी मराठवाड्यासोबतच राज्यातील इतर विभागांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठीही मदत मंजूर केली आहे. यामध्ये नागपूर विभागासाठी ७ कोटी ५१ लाख रुपये, नाशिक विभागासाठी ५९ कोटी ३६ लाख रुपये, अमरावती विभागासाठी १३१ कोटी ५६ लाख रुपये, पुणे विभागासाठी १०३ कोटी ३७ लाख रुपये आणि कोकण विभागासाठी २ लाख रुपये इतकी मदत मंजूर करण्यात आली आहे.