Download App

‘राज्यातील तीन हजार महिला सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार’, CM फडणवीसांची घोषणा!

राज्यातील महिला सहकारी संस्थांना यापुढे राज्य सरकारच्या माध्यमातून होणारी कामे दिली जातील.

Devendra Fadnavis big Announcement : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिला सहकारी संस्थांना यापुढे राज्य सरकारच्या माध्यमातून होणारी कामे दिली जातील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रदेश भाजप महिला आघाडीच्यावतीने राज्यातील 36 लाख 78 हजार महिला भगिनींनी फडणवीसांना राख्या पाठवल्या होत्या. यानिमित्त राखी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले, समाजातील 50 टक्के असलेल्या महिलांच्या सहभागाशिवाय देश मजबूत होणार नाही. राज्य सरकारने महिलांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यातील एकही योजना बंद होणार नाही. 2029 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही महिलांचा मोठा सहभाग असेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

गणेशोत्सवादरम्यान मेट्रो 2ए आणि 7 या मार्गिकांवरील गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

राज्यात तीन हजार महिला सहकारी संस्थांची स्थापना झाली आहे. या संस्थांच्या फेडरेशनचीही नोंदणी झाली आहे. आमदार चित्रा वाघ यांनी याकामी पुढाकार घेतला होता. यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. बचतगट किंवा अन्य मार्गांनी कर्ज घेणाऱ्या महिला 100 टक्के कर्ज परत करतात. त्या तुलनेत पुरुष मात्र कर्जाची परतफेड करत नाहीत असे स्पष्ट करत महिला सहकारी संस्थांना सरकारी विविध कामे, कंत्राटे दिली जातील. लवकरच ही योजना सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या या घोषणेनंतर महिलांसाठी सरकारी पातळीवर आणखी एक योजना सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मतचोरी नाही तर त्यांचे डोके चोरी

यानंतर त्यांनी काँग्रेसकडून होत असलेल्या मतचोरीच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. महिलांनी आम्हाला मोठ्या संख्येने मतदान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सांगतात. खरंतर हीच वस्तुस्थिती आहे. पण तरीही काही जणांकडून मतचोरीचा आरोप केला जातो. माझ्यामते मतचोरी नाही तर त्यांचे डोके चोरी झाली आहे.  आता ते (राहुल गांधी) बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. लाडक्या बहिणींनी केलेल्या मतदानाला ते मतचोरी म्हणतात, जे असे बोलत आहेत तेच खरे चोर आहेत अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

… मग तेव्हा त्यांना मतचोरी दिसत नाही का?, उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच मतचोरीवर बोलले

follow us