Health Workers Protest In Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) आरोग्य कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला आहे. शासनाने दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थेट ‘जागरण गोंधळ’ आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तब्बल दहा वर्षे सेवा करूनही कायमस्वरूपी समायोजन न झाल्याने हे कर्मचारी संतप्त झाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून ते बेमुदत आंदोलन (Health Workers Protest) करत आहेत. पण शासनाकडून अजूनही ठोस निर्णय आलेला नाही.
बेमुदत आंदोलनाला सुरुवात
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी शासन सेवेत समायोजनबाबत अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे 17 ऑगस्ट पासून जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात बेमुदत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जागरण गोंधळ आंदोलनाचा माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जागरण गोंधळ
राष्ट्रीय आरोग्य अभियानात 10 वर्ष नियमित सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समायोजन करण्यात शासनाने जीआर काढला. या जीआरची अंमलबजावणी होणारी दिरंगाई त्याचबरोबर इतर जे नवीन कर्मचारी आहेत, यांच्या वेतनामधील तफावत, नवीन कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन ईपीएफ आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील 33 हजार कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणारे सर्व कर्मचारी संपूर्ण राज्यभरातील मुख्यालयमध्ये या संपामध्ये उतरलेले आहेत.
एकूण 18 मागण्या
त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक ते दीड हजार कर्मचारी या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करत आहे. यावेळी आंदोलनांकडून एकूण 18 मागण्या करण्यात आले आहे. तर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.