Maharashtra Monsoon Session : काल विधीमंडळाच्या आवारात जोरदार राडा झाला. आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर (Maharashtra Monsoon Session) यांच्या कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले. अंगातील शर्ट फाटेपर्यंत मारामारी झाली. या घटनेने राज्यातील राजकारण आणि समाजमन अस्वस्थ झालं आहे. फक्त मारामारीपर्यंतच हा प्रकार थांबला नाही. तर गुरुवारी मध्यरात्रीनंतरही हा अटक नाट्यावरून चांगलाच राडा झाला. दरम्यान, या घटनेनंतर शहाणे होत विधानभवन सुरक्षा कार्यालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विधानभवनात कोणत्याही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. विशेष परवानगी घेतल्यानंतर या मंडळींना प्रवेश मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधानभवनाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचले होते. यानंतर बुधवारी पडळकर आणि आव्हाड आमनेसामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर आमदार आव्हाड यांनी मला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारात एकमेकांना भिडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या घटनेनंतर सर्वच क्षेत्रांतून संताप व्यक्त केला जात आहे. विधिमंडळाच्या आवारात अशा पद्धतीने मारामारी होणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या घटनेचा सविस्तर अहवाल मागवण्यात आल्याचे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी सांगितले. यानंतर आता विधानसभा सुरक्षा कार्यालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. काल विधानभवन येथे राडा झाल्यानंतर आजच्या कामावर त्याचे पडसाद उमटणार आहेत. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याच मुद्द्यावर जोरदार रणकंदन होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, या घटनेची दखल घेत विधानभवन सुरक्षा कार्यालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आज विधानभवनामध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्मचारी अधिकारी यांना येण्यास परवानगी राहणार नाही. विशेष परवानगी पत्र घेऊनच प्रवेश मिळेल. आज सर्व पद्धतीचे इतर पासेस प्रवेशासाठी रद्द करण्यात आले आहेत. विधानभवन कामकाजाचा आज शेवटचा दिवस असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.