Download App

बोलणी फिस्कटली, निवडणूक लागली… : 12 जुलैला विधानपरिषदेचे धूमशान

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या (MLC Election 2024) निवडणुकीची जोरदार चर्चा आहे.

Image Credit: letsupp

MLC Elections 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या (MLC Election 2024) निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. आज या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यासाठी अखेरची मुदत होती. मुदत संपल्यानंतर या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार मिलींद नार्वेकर यांनी (Milind Narvekar) उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे. आता विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 उमेदवार असल्याने निवडणूक होणार आहे.

MLC Election : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार? आज होणार पिक्चर क्लिअर

महाविकास आघाडीचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना अर्ज मागे घ्यायला लावून त्यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यावर चर्चा सुरु होती. अमोल काळे यांचे नुकतेच निधन झाल्याने हे अध्यक्षपद रिक्त होते. पण ही चर्चा अयशस्वी झाल्यानंतर नार्वेकरांनी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे.

महायुतीला फाटाफुटीचे टेन्शन

त्यामुळे मतांची फाटाफूट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. संख्याबळाचा विचार केला तर भाजप 103, शिंदे गट 39, अजित पवार गट 40 असे महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या पाच उमेदवारांना विजयासाठी 115 आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे. म्हणजेच 12 मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे 9 आमदार भाजपसोबत आहेत. त्यामुळे आणखी तीन मते मिळवणे महायुतीसाठी अशक्य नाही.

शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. या उमेदवारांनाही विजयासाठी सात अतिरिक्त मते मिळवावी लागणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी दहा अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांंनाही अतिरिक्त मते मिळवण्यासाठी जास्त तजवीज करावी लागणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांची मोठी खेळी, अयोध्येचा खासदार भाजपचा खेळ बिघडवणार?

मविआचं संख्याबळाचं गणित

काँग्रेसचे 37 मते असून त्यांनी फक्त प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडे 14 मते अतिरिक्त राहतील. आता ही 14 मते ठाकरे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. काँग्रेसची ही मते मिळाली तर महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार मिलींद नार्वेकर निवडून येतील अशी परिस्थिती आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचाही अर्ज आहे. परंतु, त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचे फक्त एकच मत आहे. शरद पवार गटाचा त्यांना पाठिंबा आहे. शरद पवार गटाचे 12 आमदार आहेत. याशिवाय सपा आणि माकपाची तीन मते जयंत पाटलांना मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त आणखी सात मतांची तजवीज त्यांना करावी लागणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज