मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कांद्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार वाद झाले. विरोधकांनी केलेल्या मागण्यांवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे बोलत असतानाही विरोधकांची गोंधळ सुरू होता. विरोधक मुख्यमंत्री शिंदे यांना काही बोलू देण्याच्या मनस्थितीत नव्हते.गोंधळ वाढत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चा सांभाळला. तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर कांद्यावरून हक्कभंग आणाच, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.
अमरावतीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला लाठीमार, कांद्याचे पडलेले भाव तसेच नाफेड खरेदीच्या नोंदणीत उडालेला गोंधळ याचे पडसाद मंगळवारी विधीमंडळ अधिवेशनात उमटले. कांद्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले.
हे सुद्धा वाचा : Maharashtra Budget Session : कांदाप्रश्नी विरोधकांनी घेरलं; शिंदेंच्या मदतीला पुन्हा फडणवीस धावले
यानंतर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उभे राहिले, तेव्हा विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अजित पवार, छगन भुजबळ, नाना पटोले यांनी हा विषय लावून धरला. यावर मुख्यमंत्री माहिती देत असतानाही विरोधकांनी त्यांना बोलू दिले नाही.
मुख्यमंत्री म्हणाले, की सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारला माहिती आहे. निकष डावलून नुकसान भरपाई दिली. नाफेडने खरेदी सुरू केली आहे. जर सुरू केली नसेल तर सुरू केली जाईल. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र, काही उपयोग झाला नाही.
Maharashtra : ठाकरे गटाची चाल, मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आणणार अविश्वास ठराव ?
त्यानंतर मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप केला.ते म्हणाले,की मुख्यमंत्री जेव्हा जबाबदारीने सांगतात तेव्हा कांदा खरेदी सुरू झाली आहे. सगळ्या प्रकारच्या कांद्याची खरेदी सुरू केली आहे. आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचे आहे, हे ठरवले पाहिजे.
मुख्यमंत्री सांगत आहेत की नाफेडने कांद्याची खरेदी सुरू केली आहे. तरी विरोधकांकडे जर काही वेगळी माहिती असेल तर हक्कभंग आणवा, असे आव्हान त्यांनी दिले.