गडचिरोलीमध्ये माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई; 18 पथके, 800 जवान आणि 44 स्मारके उध्वस्त

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे माओवादी चळवळीच्या उरल्यासुरल्या अस्तित्वावर मोठा प्रहार.

Untitled Design 66

Untitled Design 66

Major operation against Maoists in Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक ठरलेली तब्बल 44 स्मारके 18 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी जमीनदोस्त करत मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस दल आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त मोहिमेत ही धडक कारवाई पार पडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे माओवादी चळवळीच्या उरल्यासुरल्या अस्तित्वावर मोठा प्रहार झाल्याचे मानले जात आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागात दहशतीचे सावट निर्माण करणाऱ्या या स्मारकांच्या हटवण्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

माओवाद्यांकडून दुर्गम गावांमध्ये आपले अस्तित्व दाखविण्यासाठी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी दगडी व सिमेंटची स्मारके उभारली जात होती. या स्मारकांच्या माध्यमातून त्यांच्या हिंसक विचारसरणीचा प्रचार केला जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. हीच दहशतीची खाणाखुणा पुसून काढण्यासाठी बुधवारी तब्बल 18 पथके तैनात करण्यात आली होती. या कारवाईत सी-60, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाचे मिळून सुमारे 800 जवान सहभागी झाले होते.

कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच स्मारकांमध्ये आयईडी किंवा स्फोटके लपवून ठेवली असण्याची शक्यता लक्षात घेऊन 16 बॉम्बशोधक व नाशक पथकांनी परिसराची कसून तपासणी केली. पूर्ण सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच स्मारके पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत काटेकोर नियोजन आणि उच्चस्तरीय समन्वय राखण्यात आला होता.

सुनील तटकरे विरुद्ध रोहित पवार भांडणात आमदार बापू पठारे यांचा विषय निघाला

उपविभागनिहाय पाहता एटापल्ली येथे सर्वाधिक 18 स्मारके पाडण्यात आली, तर हेडरी येथे 17 स्मारके जमीनदोस्त करण्यात आली. भामरागडमध्ये 5, जिमलगट्टा येथे 2, धानोरा आणि पेंढरी येथे प्रत्येकी 1 स्मारक हटविण्यात आले. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून माओवादी प्रभावाखाली राहिलेल्या भागांमध्ये प्रशासनाची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा (जां.) यांसारख्या माओवाद्यांचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या गावांमध्येही ही कारवाई करण्यात आली. ही स्मारके केवळ बांधकामे नसून माओवादी विचारांचा प्रचार करणारी प्रतीकात्मक केंद्रे होती. ती हटविल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना बळावली असून दहशतीच्या छायेतून मुक्ती मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले. एकूणच, या व्यापक मोहिमेमुळे माओवादी प्रभावाला मोठा धक्का बसला असून दुर्गम भागात शांतता आणि विकासाचा मार्ग अधिक मोकळा झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Exit mobile version