पुतळ्यांच्या माध्यमातून मराठा समाजाविरोधात इतर समाजांना भडकावण्याचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप

राज्यातील विविध भागांमध्ये वादग्रस्त ठिकाणी अचानक आणि अनधिकृतपणे पुतळे उभारले जात असल्याचं चित्र समोर येत आहे.

Untitled Design 31

Untitled Design 31

Manoj Jarang’s allegation : राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं असून, या प्रकरणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये वादग्रस्त ठिकाणी अचानक आणि अनधिकृतपणे पुतळे उभारले जात असल्याचं चित्र समोर येत आहे. मात्र, हे केवळ पुतळे उभारण्यापुरतं मर्यादित नसून, यामागे समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा मोठा डाव असल्याचा संशय जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, अनेक ठिकाणी रात्रीतून पुतळे बसवले जातात आणि त्यानंतर त्याठिकाणी वाद निर्माण होईल, अशी परिस्थिती जाणीवपूर्वक तयार केली जाते.

यामुळे मराठा समाजाच्या विरोधात इतर समाजांना भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाद होणार असेल अशा ठिकाणी पुतळे उभारू नका. पुतळा बसवायचा असेल तर सर्वांच्या संमतीने आणि विश्वासात घेऊनच निर्णय घ्या, असं स्पष्ट आवाहन त्यांनी यावेळी केलं. जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, छत्रपतींच्या नावाचा वापर करून समाजात फूट पडण्याचा प्रयत्न अत्यंत धोकादायक आहे आणि हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मान्य होणार नाही. जातोय तेढ निर्माण होणार असेल, तर पुतळे उभारण्यात काहीच अर्थ नाही, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं.

या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप करत त्यांनी सांगितले की, काही ठिकणी पुतळ्यांच्या बाजूला त्यांचा फोटो किंवा बॅनर लावून त्यांची बदनामी करण्याचा कट रचला जाय आहे. शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून बाजूला माझा फोटो लावला जातो, हा प्रकार समाजात भांडणं लावण्यासाठी आणि माझी बदनामी करण्यासाठी केला जात आहे, असं ते म्हणाले.

या संपूर्ण प्रकारमागे कोण आहे, याचा शोध घेत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. हे पुतळे विकतो कोण, घेतो कोण आणि बसवतो कोण? हे आम्ही शोधात आहोत. हे सगळं जाणूनबुजून सुरू आहे का, याचा देखील तपास केला जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच, पुतळे उभारताना अधिकृत जागा, कायदेशीर प्रक्रिया आणि समाजांची संमती आवश्यक असल्याचं त्यांनी पुन्हा अधोरेखित केलं.

दरम्यान, त्यांनी एका वेगळ्या वादावर देखील भाष्य केलं. जैन मुनींनी महाराणी ताराबाई यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे मुनी राहिलेले नाहीत, तर मुनीर भाई झाले आहेत, अशी टीका करत त्यांनी जैन समाजाने अशा व्यक्तींना आवर घालावा असं आवाहान देखील केलं. आपण आयुष्यभर समाजासाठी काम केलं असून समाजाने आपल्यावर विश्वास ठेवावा, असं सांगताना जरांगे पाटील यांनी आरोप केला की, मराठा समाज मोठा होऊ नये, अशी काहींची उच्च असून त्यासाठीच अशा प्रकारचे वाद निर्माण केले जात आहेत.

मराठा समाजाच्या विरोधात इतर जातींना उभे करण्याचा हा नियोजित डाव असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्याच्या परिस्थितीत छत्रपतींच्या नावावरून निर्माण होणारे वाद आणि त्यातून वाढणारी सामाजिक दरी लक्षात घेता, पुतळे उभारताना संवेदनशीलता, कायदेशीरता आणि सामाजिक सलोखा राखणं अत्यंत गरजेचं असल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

Exit mobile version