Manoj Jarange Patil On Mahadev Munde murder case : महादेव मुंडे हत्या प्रकरणातील (Mahadev Munde murder case) आरोपींना तात्काळ शोधून अटक करावी, अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे केली होती. यानंतर जरांगे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना आपण काय सोबत असून जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही, तोपर्यंत लढा चालू ठेऊ, असा शब्द दिला. तसेच जरांगेंनी सरकारलाही इशारा दिला.
आठ दिवसांच्या आत आरोपींना अटक करावी, आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीडमध्ये एकत्र आलेली दिसतील, असा इशारा जरांगेंनी दिला.
महादेव मुंडे यांची 20 महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीत निर्घृण हत्या झाली होती. ज्ञानेश्वरी मुंडे न्यायासाठी सरकारकडे दाद मागत आहेत. मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलले जात नाही. अशातच आज ज्ञानेश्वरी मुंडेंनी जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी सरकारला कडक इशारा दिला आहे. जरांगे म्हणाले की, आम्ही कायम महादेव मुंडे यांच्या कुटुंबासोबत उभे राहू आणि न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही. ही हत्या किती क्रूरपणे झाली हे कोणाला माहिती नव्हते, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना माहित झाले. महादेव मुंडे यांच्या हत्या झाल्यानंतर आरोपी आठ दिवस मांस घेऊन फिरत होते. मुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावणारी बाब आहे. कारण तुमच्या राज्यात महादेव मुंडे यांची हत्या होते आणि ते आरोपी दोन वर्षांपासून सापडत नाहीत, असे मुडदे पडत असतील तर बीड जिल्ह्यातील जनतेने आता जागं झालं पाहिजे, असं जरांगे म्हणाले.
दौंडच्या कला केंद्रात गोळीबार प्रकरण; संशय खऱा ठरला, आमदारांचा भाऊ असल्याचं आलं समोर
राज्य गुंड चालवत आहेत का?
जरांगे म्हणाले, फडणवीस यांचे राज्य गुंड चालवत आहेत का? तुम्हाला या राजगादीवर बसवणारी गोरगरीब जनता आहे. मुख्यमंत्री यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ द्यावा, ते वेळ का देऊ शकत नाहीत? महादेव मुंडे प्रकरणात जो काही तपास होत आहे, तो तपास ज्ञानेश्वरी मुंडे यांना सांगितला पाहिजे. महादेव मुंडे प्रकरणात पहिल्या दिवसापासून ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, त्यांचे आम्हाला सीडीआर हवे आहेत.
महादेव मुंडे प्रकरणात बीडच्या जनतेनं रस्त्यावर उतरायचं ठरवलं किंवा आंदोलन करायचं ठरवलं तर मुख्यमंत्र्यांना अवघड जाईल, मी मनोज जरांगे तुम्हाला विनंतीपूर्वक सांगत आहे की, आठ दिवसांच्या आत एसआयटी गठीत करा, आरोपी अटक केल्यानंतर मुंडे कुटुंबांना वकील द्या, या कुटुंबाला शंभर टक्के धोका आहे आणि त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं, असंही ते म्हणाले.
पालकमंत्री काय करत आहेत?
बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी बीड जिल्हा सोडून द्यावा, आम्हाला त्यांची काहीही गरज नाही, जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही पालकमंत्री म्हणून काय करत आहात? आमचे मुडदे पाडता का? अजित पवार पालकमंत्री झााले तर बीडचा चेहरामोहरा बदलेल, असं आम्हाला वाटत होतं, पण तसे झाले नाही.
मात्र, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विनंती आहे की, दोघांनीही आठ दिवसांच्या आत आरोपींना अटक करावी, आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीडमध्ये एकत्र आलेली दिसतील आणि कसा मोर्चा असतो, हे तुम्हाला दिसेल, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला.