Download App

“मला संपवण्याचा फडणवीसांचा डाव, आता ‘सागर’ बंगल्यावरच आंदोलन”; गंभीर आरोप करत जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange Serious Allegations on Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज्य सरकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार नाही तर देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच रचलं आहे. त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी लोकं पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. मी आता थेट सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार आहे’, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, ‘मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्र फडणवीस माझा एन्काऊंटर करण्याच्या विचारात आहेत. आज मराठा समाजाचा दरारा निर्माण झाला आहे. परंतु, मराठ्यांच्या हातूनच संपवण्याचे काम केले जात आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे दोन-चार आणि अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत.’

‘मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला आता संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दहा टक्के आरक्षण लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरू द्यावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Supriya Sule : बावनकुळेंच्या पोटातलं ओठांवर आलं ‘त्या’ वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनी घेरलं

‘राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. पण ओबीसीतून आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे. राज्य सरकारनेच सांगितलं होतं की सरसकट मिळत नाही म्हणून सगेसोयरे शब्द दिला. हे सगळं एकटा देवेंद्र फडणवीस करतायत’, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ‘मराठा समाजाला संपवण्याचं काम सध्या सुरू आहे. यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांचेही काही लोक आहेत. काही समन्वयकही यात सहभागी आहेत. मला बदनाम करण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतील. फडणवीस म्हटले तर नारायण राणे सुद्धा काहीच करू शकत नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंनाही हे दोन काहीच करू देत नाहीत’, असेही जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीसांना खुमखुमी असेल तर मीच येतो सागर बंगल्यावर 

‘देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे तर ही बैठक संपल्यानंतर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं. तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे का?, असा सवाल उपस्थित करत मी सागर बंगल्यावर येतो. माझा बळी त्यांनी घेऊन दाखवावा. मी समाजाशी असलेली इमानदारी सोडू शकणार नाही. मराठा समाजाला ‘ओबीसी’तून आरक्षण पाहिजे अशीच आमची मागणी आहे. आम्ही आरक्षण घेणारच आणि 10 टक्के आरक्षणाला हातही लावणार नाही’, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

Chhagan Bhujbal : “लहान पक्षही मोठे होतात” छगन भुजबळांचा बावनकुळेंना खोचक टोला

मी कोणत्याच पक्षाचा नाही 

जरांगे पाटील म्हणाले, ‘मी सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी जर स्वार्थी आणि लबाड असतो तर मागेच उघडा पडलो असतो. कुणीतरी मराठ्यांना हरवण्याचं स्वप्न पाहत आहे. मी कोणत्याच पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही. कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. उद्धव ठाकरे असतानाही मी त्यांना कडक शब्दांत बोललो होतो, असे जरांगे पाटील म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज