Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी नुकतेच सहा दिवसांचे उपोषण केले होते. उपोषण स्थगित केल्यानंतर काही कारणांमुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रुग्णालयातून त्यांना आज घरी सोडण्यात येणार आहे. याआधी जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला पुन्हा रोखठोक इशारा दिला. आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Manoj Jarange : अखेर उपोषण स्थगित; मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय, म्हणाले कोर्टाचा आदर करतो
जरांगे पुढे म्हणाले, मी प्रामाणिकपणे समाजासाठी लढतोय. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका. कितीही ताकद लावीन पण आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही. आता लढून आरक्षण मिळवायचं आहे. आतापर्यंत कायदेशीर लढाई केली, पावणे दोन वर्ष लढलो. सरकारला जर हे जमत नसेल तर रस्त्यावर उतरून लढू असा इशारा त्यांनी दिला. 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत गाठी भेटी नियोजन करणार आहोत. राज्यातील प्रत्येक गावातील अडचण आम्हाला समजायला हवी. 22 मार्चपर्यंत आम्हाला भेटण्यासाठी या असे आवाहन त्यांनी केले.
आता अनेक गाव जोडणार आहोत. एक महिन्याच्या कालावधीत कधीही आम्हाला भेटण्यासाठी या, तुमच्या अडचणी सोडवू. आम्ही लोकांच्या कामात हातभार लावू. गरीबानेच या चळवळीत उभे राहावे. आमच्यासाठी आता लोकांना जोडणं महत्वाचं आहे. सलग एक महिना लोकांना जोडण्याचं काम करणार आहोत. खानदेश, विदर्भ, कोकण सगळ्या लोकांनी आमच्याकडे यावे. कुणबी मराठा एकच आहे. कुणीही भेदभाव ठेऊ नये. स्वतःहून आमच्याकडे या, कनेक्टिव्हिटी मोहिमेत सहभागी व्हा असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बापाची माया दिसून आली. मुलीची परीक्षा झाल्यावर ते वर्षा बंगल्यात राहायला जाणार आहेत. लेकीच्या शब्दाच्या पलीकडे तुम्ही जात नाहीत, ती मोठी व्हावी ही आमची शुभेच्छा. पण तुमच्या लेकीत तुम्ही आमच्या मुलांना का बघत नाही? मग तुम्हाला का आमच्या पोरांची माया येत नाही. फडणवीसांची नियत चांगली नाही. तुमची जशी तुमच्या लेकीसाठी तळतळ आहे, तशी तळतळ आमच्या लेकरांसाठी असू द्या.
मी उपोषण करणार नाही, आता वेगळ्या मार्गाने..मनोज जरांगेंची मोठी घोषणा
आमचं EWS तुम्ही घालवलं आणि खापर आमच्यावर फोडता. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत तुम्ही आमच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. हा भेदभाव कशामुळे? फडणवीस स्वतःच्या मुलीची परीक्षा असल्याने 500 मीटरवर राहायला जात नाही. मग मराठ्यांच्या मुलांबाबत ही माया का नाही? कधी देणार आम्हाला आरक्षण? आता मराठ्यांनी डोळे उघडावे. 500 मीटर राहायला गेलं तर काय बिघडत? पण शिक्षणाला फडणवीस महत्व देतात.
स्वतःच लेकरु मोठं करायचं हा फडणवीस यांचा संदेश आहे. मराठ्यांनी यातून बोध घ्यावा. स्वतःच्या मुलांबाबत वेगळी वागणूक आणि दुसऱ्यांच्या मुलांबाबत वेगळी भूमिका हे असं होतं असेल तर वेगळं आंदोलन करावं लागणार आहे. लवकरच मी मुंबईत आझाद मैदानाची पाहणी करायला जाणार आहे. तारीखही लवकरच जाहीर करणार आहे. मराठ्यांशी गद्दारी कराल तर फळ भोगायला तयार राहा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.