Download App

मुंबईतील एक अन् उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षकांना वेगळा न्याय का? आमदार तांबेंचा EC ला सवाल

अहमदनगर : शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणे, ही बाब फक्त मुंबई शहर व उपनगरांपुरती मर्यादित नाही. संपूर्ण राज्यातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवले जात आहे. यातून राज्यभरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यातील शिक्षकांसाठी हा आदेश देण्याची गरज आहे, अशी मागणी नाशिक पदवीधर विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. (MLC Satyajit Tambe has demanded that teachers in Maharashtra should be exempted from election duty)

आमदार तांबे या पत्रात म्हणाले की, मुंबई शहर व उपनगर या भागातील शिक्षकांसाठी काढलेल्या या आदेशांचं स्वागतच आहे, पण हा प्रश्न फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही. राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. अशावेळी या शिक्षकांना शाळाबाह्य कामे लावल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हा राज्यव्यापी प्रश्न असताना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फक्त मुंबईपुरता निर्णय कसा दिला? असाही सवाल त्यांनी केला आहे.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना लवकरच अटक होणार; ‘आप’ नेत्याच्या दाव्याने खळबळ!

आज राज्यातील एकेका शाळेतील ९० टक्के शिक्षक शाळाबाह्य कामांसाठी आणि विशेष करून निवडणुकीच्या कामांसाठी शाळेबाहेर आहेत. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांचं अपरिमित शैक्षणिक नुकसान होतं. ते भरून काढणं कठीण आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती असल्याने मुंबईसाठी काढलेला निर्णय संपूर्ण राज्यात लागू करायला हवा. फक्त एकाच जिल्ह्यापुरता निर्णय देणं हे संपूर्ण राज्यातील शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे, अशीही भावना आमदार तांबे यांनी त्यांच्या पत्रात व्यक्त केली.

America Moon Mission : चंद्रावर उतरलं अमेरिकेचं लॅंडर; भारतानंतर दक्षिण ध्रुवावर जाणारा ठरला दुसरा देश

निवडणुकीच्या कामातून मुंबईतील शिक्षकांना ‘सुट्टी’ :

मुंबईमधील सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सुट्टी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांच्या सुचनेनंतर अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहे. मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करावे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर आता फक्त मुंबईतील नाही तर महाराष्ट्रातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सुट्टी द्यावी अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

follow us

वेब स्टोरीज