मी कोपरगावकरांना २०१९ च्या विधानसभा निवडणूक (Election) प्रचारादरम्यान हक्काचं पाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं, तो शब्द मी पुर्ण केला असला, तरी कोपरगावला नियमित पाणी देण्याचं माझं स्वप्न आहे. ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे, ज्याप्रमाणे कोपरगावचा पाणी प्रश्न सुटला त्याप्रमाणे इतरही विकासाचं प्रश्न येत्या काळात पूर्ण करायचे आहेत.
त्यामुळे विकासाला विरोध करणाऱ्यांना निवडून देण्यापेक्षा विकास कामे करणाऱ्यांना निवडून द्या विकासाच्या बाबतीत तुम्हाला पाच वर्षात कोपरगाव बदलेले दिसेल अशी ग्वाही आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ०८ मध्ये झालेल्या कॉर्नर सभेत बोलतांना दिली. कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ०८ मध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन करतांना आशुतोष काळे बोलत होते.
कोपरगाव शहराच्या विकासाला विरोध करण्याचे काम विरोधकांकडून करण्यात आले आहे. अश्या विकासाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीच्या व्यक्ती पुन्हा निवडून दिल्या तर कोपरगावच्या विकासाचे भविष्य कसे घडणार याचा गांभीर्याने विचार करा. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांच्यासारखा समाजकारणी व अनुभवी उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिला आहे. त्यांचे सामाजिक, काम व सहकार क्षेत्रातही मोठे काम आहे.
त्यांच्याकडे असलेले विकासाचे व्हिजन आणि कामाच्या माध्यमातून राज्यभर फिरत असताना त्यांनी पाहीलेले अनेक विकसित शहर पाहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विकासाच्या अनेक संकल्पना आहेत. त्या विकासाच्या संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी लागणारा निधी मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे असंही ते म्हणाले.
आज कोपरगावकरांना चार दिवसाला पाणी मिळत असल्याने शहरातील उपनगर झपाट्याने वाढू लागली आहे. पाच लाख दहा लाख किमतीचे प्लॉट आता पंचवीस लाख किमतीचे झाले आहे. शहरामध्ये झपाट्याने खासगी इमारतीचे आणि बंगल्यांची कामे चालू आहे. आपल्या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ५ नंबर तलावा प्रमाणे ३ व ४ नंबर तलावाचे काम सिमेंट कॉंक्रीटचे करावे लागणार आहे.
त्याचबरोबर तलावाची खोली ३० फुटापर्यंत खोल करावी लागणार आहे. तेव्हा कुठे कोपरगाव शहराचा पुढील ५० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. यातून शहराला नियमित पुरेसे पाणी मिळेल. दररोज नियमित पाणी मिळावे हि कोपरगावकरांची मागणी नाही परंतु कोपरगावकरांना दररोज नियमित पाणी द्यायचं माझ स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण करणारच त्यासाठी कोपरगाव नगरपालिकेची सत्ता द्या असं आवाहन अशुतोष काळे यांनी यावेळी केले.
