मुंबई : माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दिघावकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दिघावकर हे 1987 मध्ये उपअधीक्षक म्हणून पोलिसात रुजू झाले आणि 2001 मध्ये त्यांची आयपीएसमध्ये नियुक्ती झाली होती. (Former Indian Police Service officer Pratap Dighavkar will join the Bharatiya Janata Party)
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना दिघावकर म्हणाले, “देशातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आणि आपल्या जीडीपीमधील लक्षणीय सुधारणेमुळे मी प्रभावित झालो आहे. भारताला पूर्वी सॉफ्ट स्टेट म्हटले जात होते. सर्जिकल स्ट्राईकमुळे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील आपण अधिक मजबूत झालो आहोत आणि पूर्वीची प्रतिमा बदलली आहे, त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असंही त्यांनी सांगितलं.
प्रताप दिघावकर हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी आहेत. 1987 मध्ये उपअधीक्षक म्हणून पोलिसात रुजू ते झाले होते. तर 2001 मध्ये त्यांची आयपीएस म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी पुणे आणि रायगड जिल्ह्यांत पोलिस अधीक्षक, मुंबई येथे 2, 4 आणि 9 झोनसाठी पोलिस उपायुक्त म्हणून आणि वाहतूक पोलिस आणि मुंबई (दक्षिण) येथील अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम केले आहे. तर महानिरीक्षकपदी बढती झाल्यानंतर त्यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती झाली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार दिघावकर यांचा लोकांमध्ये चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांना नाशिक किंवा धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबतचे आश्वासन मिळाले असल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकची जागा सध्या शिवसेनेकडे असून हेमंत गोडसे हे तिथून खासदार आहेत. तर धुळ्याची जागा भाजपकडे असून माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे तिथले खासदार आहेत.
दिघावकर हे नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक असताना निवृत्त झाले आहेत. त्यानंतरच त्यांनी राजकीय तयारीला सुरुवात केली होती. मात्र 2021 मध्ये ठाकरे सरकारकडून त्यांची अचानक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे काही काळ त्यांनी तयारी थांबली. मात्र तिथून राजीनामा देत त्यांनी पुन्हा राजकीय तयारीला सुरुवात केली आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मागील तीन लोकसभा निवडणुकीत इथून भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. तर आतापर्यंत इथून 5 वेळा भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. 1996 साली साहेबराव बागुल, 1999 साली रामदार गावित, 2009 मध्ये प्रताप सोनावणे तर 2014 आणि 2019 मध्ये डॉ. सुभाष भामरे हे भाजपच्या तिकीटावर विजयी झाले आहेत.
या दरम्यान, दिघावकर यांनी नाशिकमध्येही मोठे काम केले. शंकराराव गडाख ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून दिघावकर यांनी नाशिकमध्ये जलसंधारणाच्या कामासाठी मोठा निधी आणला होता. त्यामुळे नाशिक परिसरात त्यांची चांगली प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे आता त्यांना तिकीट मिळणार का? आणि मिळाले तर कुठून मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.