Download App

आव्हाडांचा पवार कुटुंबियांशी थेट पंगा; रोहित पवार लहान, त्यांच्या विधानाकडे लक्ष देत नाही

  • Written By: Last Updated:

शिर्डी : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आव्हाडांना घरचा आहेर देत टीका केली होती. या टिकेला आव्हाडांनी थेट उत्तर दिले आहे. ते म्हणाले की,रोहित पवार काय बोलतात याकडे मी फार महत्त्व आणि लक्ष देत नाही. अजून ते फार लहान असून, त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाहीये असे म्हणत त्यांची ही पहिलीच टर्म असल्याचे आव्हाडांनी म्हटले आहे. आव्हाडांच्या या उत्तररामुळे त्यांनी आता थेट पवार कुटुंबियांशी पंगा तर घेतला नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. ते शिर्डीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काल (दि. 3) जे मी बोललो ते ओघात बोलल्याचे स्पष्टीकरणही आव्हाडांनी दिले आहे. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. रामासंबंधात वाद मला वाढवायचा नाही असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. (Jitendra Awhad Press Conference )

रोहित पवारांवर काय म्हणाले आव्हाड?

रोहित पवारांनी आव्हाडांच्या विधानावर एक ट्विट केले होते. त्याबाबतचा प्रश्न आव्हाडांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आव्हाडांनी मी रोहित पवार यांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देत नाही. ते अजून लहान असून, अबुधाबीवरून बोलणं सोप असतं असा टोला आव्हाडांनी रोहित पवारांना लगवला आहे. तसेच शरद पवार मला कधी माझे सामाजिक विचार मांडू नको असे कधी बोललेले नसल्याचेही आव्हाड म्हणाले. मी जेव्हा पुरंदरे यांचा विरोध केला होता तेव्हा शरद पवार मला म्हणाले होते की, तुझा इतिहासाचा अभ्यास चांगला असेल आणि पुरावे तुझ्याकडे असतील तर तू बोल हे बोलणारे शरद पवार असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.

रोहित पवारांचं ट्विट काय?

आव्हाडांच्या कालच्या विधानानंतर रोहित पवार यांनी एक ट्विट करत आव्हाडांचे कान टोचले होते. त्यात त्यांनी आव्हाडांना एक सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जातीजातीत निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची गरज आहे.

‘राम शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी’ जितेंद्र आव्हाडांचा दावा

देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही राजकारण करू नये. पण, देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले होते आव्हाड ?

राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबीरात बोलताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राम हा बहुजनाचा होता. राम मांसाहारी होता. तुम्ही आम्हाला का शाकाहार शिकवत आहात. ते चौदा वर्ष जंगलात राहत होते, असं असताना ते केवळ कंदमुळे खात होते का? ते शाकाहारी कसे असू शकतात, तर नाही. ते मांसाहार देखील करत होते, असं आव्हाड यांनी केलं. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जातोय, असंही आव्हाड म्हणाले.

 

बातमी अपडेट होत आहे… 

follow us

वेब स्टोरीज