Download App

राहुल गांधी महाराष्ट्रात येताच काँग्रेसला भगदाड; भाजपाचा झेंडा हाती घेणारे पद्माकर वळवी कोण ?

Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा घेऊन नंदूरबारमध्ये दाखल झाले. नेमक्या याच वेळी भाजपने राजकारणाचा डाव टाकत काँग्रेसचा मोठा नेता गळाला लावला. नंदूरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे प्रस्थ पद्माकर वळवी (Padmakar Valvi) आता भाजपवासी झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत वळवी यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. या राजकारणाचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा हात सोडणारे पद्माकर वळवी नेमके कोण आहेत? त्यांच्या या निर्णयाने काँग्रेसचे कसे नुकसान होणार आहे? हे जाणून घेऊ या..

पद्माकर वळवी आघाडी सरकारच्या काळात आदिवासी विकास राज्यमंत्री तसेच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री होते. नंदूरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुराही त्यांच्याकडे होती. मंत्रिपद असतानाही त्यांना आपल्या कामाचा ठसा उमटवता आला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पद्माकर वळवी नंदुरबारमधील शहादा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. वळवी यांनी राज्याच्या क्रीडा खात्याची धुरा सांभाळली आहे. नंदूरबार, उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिला जात होते. 2009 मध्ये शहादा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. वळवी यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या आहेत.

Rahul Gandhi : अदानींच्या फायद्यासाठी ‘अग्निवीर’चा घाट; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल  

अविश्वास प्रस्ताव अन् वळवींची महाराष्ट्रात ओळख

वळवी यांचे नाव 2002 मध्ये चर्चेत आले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावेळी वळवी यांचे अपहरण केल्याचा आरोप झाला होता. 5 ते 12 जून या कालावधीत त्यांना मातोश्री क्लबवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे वळवी यांचे नाव चांगलेच चर्चेत आले होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अद्याप दुसरी यादी जाहीर केलेली नाही. त्याआधीच वळवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांच्या विरोधात भाजपसह शिंदे गटात मोठी नाराजी आहे. त्यामुळे यंदा गावित यांना उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. पद्माकर वळवी काँग्रेस सोडणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये आल्यानंतर वळवी यांनी टायमिंग साधत काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.

Loksabha Election : कमलनाथांच्या दबावापुढे काँग्रेस झुकली ! मुलाला लोकसभेचे तिकीट; दुसऱ्या यादीत ओबीसींचे वर्चस्व

follow us

वेब स्टोरीज