राजमाता कल्पना राजे भोसले यांनी एनसीईआरटीच्या (NCRT) अभ्यासक्रमातून महाराष्ट्राचा नकाशा गायब झाल्याच्या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त करत कडक इशारा दिला आहे.
एनसीईआरटीच्या पुस्तकातून महाराष्ट्राचा नकाशा वगळण्यात आल्याची बाब अत्यंत गंभीर असून, हा प्रकार कदापिही सहन केला जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. तसंच, जोपर्यंत पृथ्वीवर सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आणि महाराष्ट्राचा अभिमान कायम राहील.
महाराष्ट्राचा नकाशा पुसण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यम प्रतिनिधींनाही या मुद्द्यावर आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. या संपूर्ण प्रकरणाला महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचेही राजमाता कल्पना राजे भोसले यांनी स्पष्ट केलं.
छत्रपती संभाजीराजे यांनीही केला होता आरोप
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस आणि विश्वासार्ह कारण न देता काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही ठिकाणी राजपुतानातील भागांचा समावेश दाखवल्याबाबत आक्षेप घेण्यात आले असल्याचे सांगितले जाते, मात्र हे आक्षेप ऐतिहासिक पुराव्यांच्या कसोटीवर टिकत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संभाजी छत्रपती यांनी नमूद केले की, १७५८ पर्यंत मराठा साम्राज्याचा प्रभाव अटक, लाहोर, मुलतान, डेरा गाझी खान आणि खैबर पख्तूनख्वा येथील जमरूदपर्यंत पोहोचला होता. हे दावे भावनिक नसून विविध ऐतिहासिक नोंदींमध्ये स्पष्टपणे नोंदवलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
तसेच, बुंदी, कोटा आणि मारवाडसारख्या राजपुत राज्यांनी मराठ्यांना चौथाई दिली होती. यावरून त्या काळातील राजकीय आणि लष्करी वास्तव स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले. ब्रिटिश नकाशाकार जेम्स रेनल आणि रॉबर्ट विल्किन्सन यांच्या नकाशांमध्ये मराठा साम्राज्याचा विस्तृत प्रभाव दर्शवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात अनेक भारतीय आणि परदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्याच्या विस्ताराबाबत सविस्तर भाष्य केले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या “History of Maharashtra: Maratha Period (Part II)” या प्रकाशनातही संबंधित नकाशे आणि पुरावे दिलेले आहेत. तसेच, राजपुताना गॅझेटियर (१८७९) मध्ये शिंदे, होळकर आणि गायकवाड यांचा प्रभाव स्पष्टपणे नोंदवलेला आहे.
मराठा साम्राज्याचा नकाशा आधी कमी करून आणि नंतर पूर्णपणे वगळल्यामुळे इतिहासाची अपूर्ण मांडणी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अशा निर्णयांमुळे विद्यार्थ्यांना भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या अध्यायांची संपूर्ण माहिती मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
संभाजी छत्रपती यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून, शैक्षणिकदृष्ट्या अचूक आणि संतुलित स्वरूपात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. हा प्रश्न केवळ प्रादेशिक अभिमानाचा नसून राष्ट्रीय ऐतिहासिक प्रामाणिकतेचा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
