Download App

“मला ज्ञान देण्यापेक्षा मान्य करा की तुम्ही घर फोडलं”, भाग्यश्री अत्रामांचं अजितदादांना उत्तर

तुम्ही शरद पवारांना सोडून गेलात तेव्हा घर फुटत असल्याचं तुम्हाला कळलं नाही का? असा सवाल भाग्यश्री अत्राम यांनी केला. 

Bhagyashree Atram : विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या (Elections 2024) असताना फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. या राजकारणाचा अंक राजकीय मंडळींच्या घरांतच सुरू झाला आहे. अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मरावबाब अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्राम (Bhagyashree Atram) यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. भाग्यश्री अत्राम वडिलांविरोधात निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे. या घडामोडी घडत असताना धर्मरावबाबा अत्राम यांनी मुलीवर जोरदार टीका केली होती. तसेच जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने गडचिरोलीत आलेल्या अजित पवार यांनीही भाग्यश्री अत्राम यांना चार शब्द सुनावले होते. यानंतर आता भाग्यश्री अत्राम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही शरद पवारांना सोडून गेलात तेव्हा घर फुटत असल्याचं तुम्हाला कळलं नाही का? असा सवाल भाग्यश्री अत्राम यांनी केला.

काय म्हणाले होते अजित पवार ?

अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने गडचिरोलीत आले होते. यावेळी त्यांनी भाग्यश्री अत्राम यांना उद्देशून सांगितले होते की तुम्ही तुमच्या वडिलांना पाठिंबा दिला पाहिजे. निवडणुकीत जिंकण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. त्यांच्याकडेच या प्रदेशाचा विकास करण्याची क्षमता आहे. दृष्टीकोनही आहे. लक्षात ठेवा, वस्ताद नेहमी एक डाव स्वतःकडे राखून ठेवत असतो. कुटुंबातील फूट समाज कधीही स्वीकारत नाही. ही गोष्ट मी सुद्धा अनुभवली आहे. मी माझी चूक मान्य केली आहे.

Video : वस्तादाला राखून ठेवलेला डाव खेळण्याची वेळ आणू नका; अजितदादांनी सावध केलं

त्यावेळी अजितदादांच्या लक्षात आलं नाही का?

भाग्यश्री अत्राम म्हणाल्या, अजित पवार आता गडचिरोलीत येऊन मला ज्ञान शिकवत आहेत. पण तुम्ही ज्यावेळी शरद पवारांना सोडून गेलात त्यावेळी घर फुटत आहे हे तुम्हाला कळलं नाही का? आज तुम्ही मला कोणत्या तोंडाने सांगत आहात की घर सोडू नका असा सवाल भाग्यश्री अत्राम यांनी केला. आधी तुम्ही मान्य करा की तुम्ही घर फोडलं आहे. मी काही घर फोडलेलं नाही. ज्यावेळी धर्मरावबाबा अत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. त्यावेळी शरद पवार यांनीच मध्यस्थी करत त्यांची सुटका केली होती. त्यामुळे शरद पवारांचे आमच्या कुटुंबावर उपकार आहेत. त्या उपकारांतून उतराई होण्याचाच प्रयत्न मी करत आहे, असे भाग्यश्री अत्राम म्हणाल्या.

धर्मराव अत्राम काय म्हणाले होते ?

अहेरी येथील यात्रेला संबोधित करताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. विरोधक मुलीला हाताशी धरून घर फोडण्याचे काम करत आहेत. जी मुलगी तिच्या वडिलांची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार असा सवाल अत्राम यांनी केला होता. माझी खुर्ची घेण्याचा जे प्रयत्न करतील त्यांना मी बाजूला करणार आहे. मी काम करणारा माणूस आहे. सातत्याने कामच करत आलो आहे. पण आता हे मध्येच येऊन असं काही करणार असतील तर त्यांनी वाटी लावण्याचे काम आपल्याला करायचे आहे.
Sangola Constituency: शहाजीबापूंसाठी यंदाही एकदम ओके नाहीच; ‘लाल वादळ’ घेरणार

follow us