Download App

बारामतीमध्ये अजितदादांची ‘साखरपेरणी’ : संग्राम थोपटेंसाठी मोठा डाव

बारामती : यंदा बारामती जिंकायचीच, सुप्रिया सुळे यांचा पराभव करुन शरद पवार यांना चितपट करायचेच असा जणू चंग भाजपने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. त्यासाठी अजितदादांनी मतदारसंघात जातीने लक्ष घातले आहे. मतदारसंघातील समीकरणे साधण्यावर ते भर देत आहेत. यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही त्यांना मदत करत आहेत. दौंड, इंदापूर, पुरंदर इथले वाद मिटविण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. अशात आता भोर, वेल्हा, मुळशी या तीन तालुक्यांमध्ये पसरलेल्या मतदारसंघातील टेन्शन कमी करण्यासाठी अजितदादांनी ‘साखर पेरणी’ला सुरुवात केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 12 आणि केवळ एकाच काँग्रेसच्या (Congress) नेत्यांशी संबंधित अशा एकूण 13 साखर कारखान्यांना एक हजार 898 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेऊन ते कारखान्यांना देणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली होती. (tate government has decided to provide loans of 1 thousand 898 crores to 13 sugar mills belonging to 12 leaders of BJP, NCP and only one Congress leader.)

लेट्सअप विश्लेषण : ‘कमळा’ला का पडली ‘इंजिना’ची गरज; ही आहेत ‘हायलाईटेड’ 5 कारणं

सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी राज्य शासनाकडे कर्जहमीचे प्रस्ताव पाठविले होते. यात वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 नेत्यांच्या आणि फक्त एका काँग्रेस नेत्यांशी संबंधित साखर कारखान्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

राज्य शासनाकडून कृपादृष्टी झालेल्या या एका काँग्रेस नेत्याचे नाव म्हणजे भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे. थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यास राज्य शासनाकडून 80 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे. या माध्यमातून थोपटेंना खूश करुन त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी त्यांची मदत घेण्याचा अजित पवार यांचा डाव असल्याचे बोलले जात आहे.

Lok Sabha Election : महाराष्ट्राची वाट खडतर! फाटाफुटीने अवघड केला निवडणुकीचा पेपर

काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी संग्राम थोपटे यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी आमदार अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यामुळे संग्राम थोपटे नेमके कोणासोबत राहणार आणि कोणाला मदत करणार असा सवाल विचारला जात होता. मात्र त्यानंतर अवघ्या आठवड्याभरताच थोपटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांची भोर तालुक्यात जाहीर सभा आयोजित करुन आपण महाविकास आघाडीसोबतच असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

या सभेनंतर पवार यांनीही थोपटे यांच्या घरी जाऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यातून अनंतराव थोपटेंसोबतचा 40 वर्षांचा संघर्ष मिटविण्याचा पवारांनी प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र आता अजितदादांनी संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेऊन त्यांना खूश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी एकप्रकारे थोपटे यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी साखर पेरणीची सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात थोपटे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us