Ajit Pawar on Thackeray Morcha : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (Maharashtra Monsoon Session) सुरू होत आहे. त्याचआधी हिंदी भाषा विरोधाच्या मुद्द्यावरून मुंबईतील (Hindi Language Row) वातावरण तापलं आहे. ठाकरे बंधूंनी या हिंदी सक्तीविरोधात 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. दुसरीकड सत्ताधारी या मुद्द्यावर प्रत्युत्तर देत आहेत. आजही अजित पवार (Ajit Pawar) यांनी या मुद्द्यावर उत्तर दिलं. खरंतर पत्रकारांनी त्यांना एक गुगली प्रश्न विचारला होता त्यावर अजित पवार यांनी खास उत्तर दिलं. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुम्ही या मोर्चात सहभागी होणार का? दोन ठाकरे बंधू एकत्र येताहेत म्हणून सरकारकडून त्यांना विरोध केला जात आहे, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, विरोध करण्याचा आमचा काय संबंध? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. यात आम्ही नाक खुपसण्याचं काय कारण. काहीच कारण नाही. आम्ही त्यांना म्हटलं नव्हतं की तुम्ही वेगळे व्हा ते त्यांच्या त्यांच्या पक्षांचे प्रमुख आहेत. त्यांनाही अधिकार आहेत. ते काय तो निर्णय घेतील. राज ठाकरेंच्या मनसेच्या फलकांवर तु्मचाही फोटो आहे असे ज्यावेळी पत्रकारांनी विचारले त्यावर या मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे असं सोपं उत्तर अजित पवार यांनी दिलं.
हिंदी सक्तीविरोधात शिवसेनेचं आंदोलन; उद्धव ठाकरेंकडून शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी
अजित पवार पुढे म्हणाले, आता जो मोर्चा काढला जात आहे त्यासंदर्भात मी सातत्याने माझी भूमिका मांडली. या मुद्द्यावर आम्ही आणखी चर्चा करू. पालकांना आपल्या मुलांना कोणती तरी भाषा शिकावी असं वाटत असतं. पण, शेवटी मराठी ही आपली मातृभाषा आहे. महाराष्ट्राच्या बाहेरुन येथे आलेल्या लोकांनी त्यांच्या मुलांनी येथे आल्यानंतर इथं जर शिक्षण घेत असतील तर त्यांना इयत्ता पहिलीपासून मराठी भाषा आली पाहिजे. म्हणूनच आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही मराठी भाषा अनिवार्य केली आहे. तोच दृष्टीकोन या पाठीमागे आहे. कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर अपार प्रेम आणि श्रद्धा आहे.
मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मराठी भाषेला अभिजात (Marathi Language) भाषेचा दर्जा देखील मिळवून दिला. खूप वर्षांपासूनची मागणी होती ती मागणी पूर्ण करण्याचं काम एनडीए सरकारनं (NDA Government) केलं. आता जो दुसरा मुद्दा पुढे आलाय त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद आहेत. बऱ्याच जणांनी आपली भूमिका मांडण्याचं काम केलं आहे. माझं मत आहे की पहिलीपासून जे इंग्रजी शाळेत शिकत आहेत त्यांनी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांचं शिक्षण घ्यावं आणि पाचवीपासून हिंदीचं शिक्षण सुरू करावं.
जो मराठीत लिहायला आणि वाचायला शिकतो त्याला हिंदीही लिहिता आणि वाचता लगेच येतं. कारण दोन्ही भाषांची लिपी एकच आहे. पाचवीपासून हिंदी शिकता येईल. आता त्याबाबत चर्चा होईल. वेगवेगळी लोकं आपापल्या पद्धतीने मतं व्यक्त करत आहेत. काहीजण मोर्चे काढत आहेत अशा शब्दांत अजित पवार यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
महायुती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर ‘मविआ’चा बहिष्कार ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची माहिती