Uddhav Thackeray on MNS Alliance : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंच्या मनसे आणि ठाकरे गटाची (Uddhav Thackeray) युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता शिवसेनच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात (Raj Thackeray) बोलताना उद्धव ठाकरेंनी या संभाव्य युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करायला तयार आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पुन्हा टाळी दिली आहे. शिवसेनेचा 59 वा वर्धापनदिन मेळावा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशी युतीसंदर्भात सकारात्मक संकेत दिले.
ठाकरे पुढे म्हणाले, मुंबई यांच्या मालकाच्या घशात घालण्यासाठी मराठी माणसाला एकत्र येऊ दिलं जात नाही. पण राज्याच्या जे मनात आहे, तुमच्या जे मनात आहे तेच मी करणार आहे. पण या गोष्टी होऊ नयेत यासाठी यांच्या मालकाचे नोकर लोक इकडे तिकडे, हॉटेलमध्ये भेटीगाठी घेत आहेत. मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकांचे काय होणार. मुंबईत मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हे प्रयत्न करत आहे. पण ठाकरे ब्रँड संपवायला गेलात तर तुमचे नामोनिशाण ठेवणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला.
“देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज, घरफोड्यांची नाही..”, उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल
ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाही. 1960 साली ज्या मराठी माणसाने बलिदान देऊन रक्त सांडून मुंबई आपल्याला मिळवून दिली, त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तुटू देणार नाही. मुंबईचं महत्व कमी होऊ देणार नाही. म्हणून आम्ही उभे राहिलो तरी मुंबई वाचेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
एक होणारच नाही म्हणतात. अरे तुला काय करायचं आहे. तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना. आम्ही बघू आमचं काय करायचं ते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशाण महाराष्टातून पुसून टाकेन. मी आज सर्व तयारीने उभा आहे, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.