ISRO Scientist Resignation : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, इस्त्रोमधील आतापर्यंत अनेक शास्त्रज्ञ आणि तांत्रिक तज्ज्ञांनी राजीनामे दिले आहे. काही दिवसात 100 पेक्षा जास्त राजीनामे देण्यात आल्याने आता या प्रकरणात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला आहे. माहितीनुसार, 100 ते 120 शास्त्रज्ञांनी संस्था सोडली आहे. संस्था सोडणाऱ्यांपैकी अनेकजण ‘गगनयान’ सारख्या महत्त्वाच्या मोहिमांशी संबंधित होते.
तर दुसरीकडे ‘अंतराळ विभागाने’ (Department of Space) 14 जुलै रोजी एक आदेश जारी करून हे राजीनामे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. शास्त्रज्ञांसाठी ऐच्छिक निवृत्ती (VRS) आणि राजीनामा देण्याबाबतचे नियम अधिक कडक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. माहितीनुसार, सर्वाधिक राजीनामे ‘यू.आर. राव सॅटेलाइट सेंटर’ (URSC) मधून आले आहेत, जिथे सुमारे 82 कर्मचाऱ्यांनी संस्था सोडली आहे. तर ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ (VSSC) मधील 20 शास्त्रज्ञांनीही राजीनामे दिले आहेत. तर राजीनाम्यांचे आणखी काही अर्ज सध्या विचाराधीन आहेत असल्याची माहिती समोर येत आहे. इस्रोमध्ये सुमारे 14,600 कर्मचारी कार्यरत असून राजीनामा देणाऱ्यांमध्ये महत्त्वाच्या धोरणात्मक प्रकल्पांशी संबंधित असलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे.
🚨 INDIA TIGHTENS RESIGNATION RULES FOR ISRO MISSION SCIENTISTS.
• More than 100 scientists have left ISRO in the past few years.
• The government has now made it harder for senior ISRO scientists to quit.
• Scientists working on major missions like Gaganyaan will need…
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) July 16, 2026
महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे राजीनामे
माहितीनुसार, राजीनामा दिलेल्यांच्या यादीत VSSC शी संबंधित असलेल्या आणि LVM-3 रॉकेट कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक असलेल्या व्हिक्टर जोसेफ (Victor Joseph) यांचा समावेश आहे. तसेच, URSC मधील SPADEX मोहिमेच्या प्रकल्प संचालकांनीही राजीनामा दिला आहे. ‘चांद्रयान-3’ मोहिमेत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम केलेले तरुण शास्त्रज्ञ आदित्य रावपल्ली (Aditya Ravapalli) यांनीही इस्त्रो सोडल्याची चर्चा आहे.
नियमांत बदल
अचानक इस्त्रोमध्ये राजीनाम्यांचे प्रमाण वाढल्याने आता अंतराळ विभागाने 2020 मध्ये निश्चित केलेल्या नियमांमध्ये काही बदल करण्याचे निर्णय घेतले आहे. इस्रोच्या केंद्रांच्या संचालकांना (Centre Directors) त्यांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या ‘गट-अ’ (Group ‘A’) मधील शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे राजीनामे किंवा VRS अर्ज स्वतः मंजूर करण्याचे अधिकार होते मात्र, ही पद्धत आता बंद करण्यात आली आहे. आता ‘गगनयान’ किंवा इतर प्रमुख मोहिमांशी संबंधित शास्त्रज्ञांनी राजीनामा दिला, तर केंद्राचे संचालक थेट राजीनामा मंजूर करू शकणार नाहीत त्याऐवजी, त्यांना संपूर्ण प्रकरण आणि त्यांच्या शिफारशी अंतिम मंजुरीसाठी अंतराळ विभागाकडे (DoS) पाठवाव्या लागतील.
इस्रो प्रमुखांकडून राजीनाम्यांच्या वृत्ताला दुजोरा
इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी या राजीनाम्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, “ही परिस्थिती हाताळण्यासाठी संस्था सज्ज आहे,” असे म्हटले आहे. मात्र, केवळ प्रशासकीय आदेशांद्वारे राजीनामे रोखण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, त्यामागची मूळ कारणे समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे काही माजी अधिकाऱ्यांचे मत आहे. देशातील वेगाने विस्तारणाऱ्या खाजगी अंतराळ क्षेत्रात मिळणाऱ्या अधिक चांगल्या संधी हे या राजीनाम्यांमागचे एक प्रमुख कारण असल्याची माहिती समोर आली आहे.
