राम मंदिरापासून हाकेच्या अंतरावर अग्नितांडव; अयोध्येत महायज्ञात भीषण आग

या महायज्ञाच्या कार्यक्रमात ५० हजार भाविक सहभागी झाले होते. या यज्ञांमध्ये ५ हजार जणांनी मंत्रोच्चारण करुन आहुती दिली.

News Photo   2026 03 28T194456.352

राम मंदिरापासून हाकेच्या अंतरावर अग्नितांडव; अयोध्येत महायज्ञात भीषण आग

उत्तर प्रदेशातील अयोध्येत शनिवारी मोठी दुर्घटना घडली. (Ram Mandir) शरयू नदीच्या तीरावर महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं असताना आगीची घटना घडली. आगीच्या ज्वाळा वेगानं पसरल्या. त्यामुळे मंडप जळून खाक झाला. या महायज्ञात सहभागी होण्यासाठी जवळपास ५० हजार जण आले होते. आग लागताच एकच खळबळ उडाली आणि सगळ्यांचीच पळापळ सुरु झाली.

अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आग नियंत्रणात आणली. यज्ञात आहुती म्हणून अर्पण केलेला नारळ फुटल्यानं दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांच्याकडून शरयू नदीच्या तीरावर महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. महायज्ञाचं ठिकाण अयोध्येतील राम मंदिरापासून केवळ ८०० मीटर अंतरावर आहे.

नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यात ठरले ;नंबर वन मुख्यमंत्र्यांकडून आयुक्त कर्णिक यांचा गौरव

मंत्री दयाशंकर सिंह यांनी आयोजित केलेल्या महायज्ञासाठी गोसाईगंजचे आमदार अभय सिंहदेखील आले होते. महायज्ञात टाकण्यात आलेला एक नारळ अचानक फुटला आणि त्यामुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आगीची तीव्रता अतिशय जास्त होती. संपूर्ण मंडप या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. घटनेची माहिती अग्निशमन दलाला तातडीनं देण्यात आली. यानंतर पुढच्या काही मिनिटांत अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यज्ञ मंडपात अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग त्वरित नियंत्रणात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी दिली. आगीची घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. गेल्या ९ दिवसांपासून महायज्ञ सुरु होता.

आज महायज्ञाचा अखेरचा दिवस होता. त्यामुळ गर्दी कमी होती. या महायज्ञाच्या कार्यक्रमात ५० हजार भाविक सहभागी झाले होते. अखेरच्या दिवशी १,२५१ हवन कुंड तयार करण्यात आले होते. या यज्ञांमध्ये ५ हजार जणांनी मंत्रोच्चारण करुन आहुती दिली. ज्यावेळी आग लागली, तेव्हा बहुतांश मंडप रिकामा झाला होता. बरेसचे भाविक परतले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Exit mobile version