Download App

मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी CBI ची धाड

CBI Conducts Raid on Satyapal Malik : देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा सीबीआयने आज (CBI) जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्या घरासह 30 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. जम्मू काश्मीरमधील किरू (Jammu Kashmir) जलविद्यूत प्रकल्पाच्या कंत्राटांशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या प्रकरणात सीबीआयने याआधीही छापेमारी केली आहे. मागील वर्षातील मे महिन्यात सीबीआयने 12 ठिकाणी छापे टाकले होते. त्यापैकी एक सत्यपाल मलिक यांचा माजी सहकारी होता. सत्यपाल मलिक यांचे मीडिया सल्लागार असलेल्या सौनक बाली यांच्या घरावर तपास यंत्रणेने छापा टाकला होता. आता ज्या 30 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली जात आहे ती ठिकाणे कोणत्या राज्यांत आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Satyapal Malik : सत्यपाल मलिक पोलिसांच्या ताब्यात, राज्यपाल असतांना मलिक गप्प का होते? शाहांचा सवाल

मी कारवाईला घाबरणार नाही : मलिक 

या कारवाईवर मलिक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. तीन ते चार दिवसांपासून मी आजारी असून रुग्णालयात आहे. असे असतानाही सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर हुकूमशहाकडून छापे टाकले जात आहेत. माझा ड्रायव्हर आणि माझा सहाय्यक यांच्यावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे.

सत्यपाल मलिक यांची राजकीय कारकिर्द 

उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी सत्यपाल मलिक यांनी मेरठच्या चौधरी चरणसिंह विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांची राजकीय कारकिर्द 1974 मध्ये बागपतचे आमदार म्हणून झाली. 1980 मध्ये ते लोकदलातून राज्यसभेत पोहोचले. त्यानंतर अलीगढचे खासदार बनले. 1996 मध्ये समाजवादी पक्षाने त्यांना तिकीट दिले. परंतु, त्यांचा पराभव झाला. यानंतर 2004 मधये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. यावेळीही पराभव झाला. 2012 मध्ये त्यांना भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पुढे सलग चार राज्यांचे राज्यपाल पद देण्यात आले.

मोदी सरकारवर कठोर टीका 

सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर कठोर टीका केली होती. पुलवामा हल्ल्यासाठी त्यांनी केंद्र सरकारलाच जबाबदार धरले होते. सीआरपीएफने आपल्या जवानांना जम्मूवरून श्रीनगरला घेऊन जाण्यासाठी 4 एअरक्राफ्ट मागितले होते. पण, गृह मंत्रालयाने काहीच कार्यवाही केली नाही. यामुळे त्यांना रस्ताच्या मार्गान जावे लागले आणि पुलवामा हल्ल्याची घटना घडली, असा दावा मलिक यांनी एका मुलाखतीत केला होता. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरही त्यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांत टीका केली होती. त्यामुळे सरकारचा त्यांच्यावरील रोष वाढला होता.

https://twitter.com/SatyapalmalikG/status/1760528793934983288?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1760528793934983288%7Ctwgr%5Ec8d94555febb5b1587603e00de529d15819201aa%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fnews%2Findia%2Fformer-governor-satyapal-malik-cbi-conducts-raids-at-multiple-locations-2619627

follow us