Download App

पाकिस्तानी अधिकाऱ्याला 24 तासांत देश सोडण्याचे आदेश; भारताकडून पर्सोना नॉन ग्रॅटा घोषित

नवी दिल्लीतील पाकिस्तानी (India Vs Pakistan) उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला भारताने पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले आहे.

India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी (India Pakistan Ceasefire) झाली आहे. यानंतर आता सीमेवर शांतता आहे. परंतु, तणाव कायम आहे. तणावात वाढ करणाऱ्या काही ना काही घटना घडतच आहेत. आताही एक मोठी बातमी हाती आली आहे. यानुसार नवी दिल्लीतील पाकिस्तानी (India Vs Pakistan) उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला भारताने पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले आहे. या अधिकाऱ्याला पुढील 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे की नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्रेटा घोषित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने त्याच्या पदाला न शोभणाऱ्या कृत्यांत सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे या अधिकाऱ्याला पुढील 24 तासांच्या आत भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा अधिकारी नेमका कोणत्या कारवायांत सहभागी होता याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

“POK खाली करा, काश्मीर प्रश्नी कुणाचीही मध्यस्थी चालणार नाहीच”; भारतानं ठणकावलं!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असतानाच ही घटना घडली आहे. जर दुसऱ्या देशाचा अधिकारी गुप्तचर कारवायांत सहभागी असेल किंवा अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करत असेल तर 1961 च्या व्हिएन्ना करारानुसार तो देश अशा प्रकारची कारवाई अधिकाऱ्यावर करू शकतो. दोन्ही देशांतील तणाव अजूनही कमी झाला नसल्याचे संकेत या कारवाईवरून मिळतात.

युद्धविरामाची विनंती पाकिस्ताननेच केली

युद्धविरामाची विनंती पाकिस्ताननेच केली (India Pakistan Ceasefire) होती. कारण त्याच दिवशी सकाळी भारतीय वायूसेनेने (Indian Navy) पाकिस्तानातील मुख्य एअर फोर्स ठिकाणांवर हल्ले केले होते. भारताची ताकदीने पाकिस्तानला गोळीबार आणि सैन्य कारवाई थांबवणे भाग पडले.

अन्य देशांबरोबर झालेल्या चर्चेत भारताने स्पष्ट केले होते की 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देत आहोत. या कारवाईत भारताने फक्त दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. जर पाकिस्तानी सैन्याने डिवचण्याचा प्रयत्न केला तर मग भारतीय सैन्य देखील सडेतोड उत्तर देईल. पण जर पाकिस्तान थांबला तर भारतही हल्ले करणार नाही. हाच संदेश ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर दिला होता. परंतु, पाकिस्तानने त्याकडे दुर्लक्ष केले असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

सिंधू पाणीवाटप करार स्थगितच..

युद्धविरामानंतर सिंधू पाणीवाटप (Indus Water Treaty) करारावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या मुद्द्याव रणधीर जयस्वाल यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. सिंधू पाणी करार हा परस्पर विश्वास आणि सद्भावनेच्या आधारावर झाला होता. परंतु, पाकिस्तानने या गोष्टी कधीच मानल्या नाहीत. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला समर्थन देऊन या तत्वांना कमकुवत करण्यात आलं. 23 एप्रिल रोजी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीनुसार भारताने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला स्थायी रुपाने समर्थन देणं बंद करत नाही तोपर्यंत हा करार स्थगितच राहील.

“त्यावेळी अमेरिकेशी व्यापारावर चर्चा नाहीच फक्त..”, भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडला

follow us