पश्चिम बंगालच्या राजकारणातून (West Bengal) मोठी बातमी समोर आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी रविवारी भाजप पक्षाचा राजीनामा देऊन सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर झालेल्या या मोठ्या उलथापालथीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
चंद्र कुमार बोस यांचा टीएमसीमधील प्रवेश हा ममता बॅनर्जी यांच्या पक्षासाठी एक मोठा राजकीय फायदा मानला जात आहे, तर भाजपला हा एक मोठा धक्का ठरला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजप पक्षावर टीका करत आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली असून नव्या चर्चांना उधाण आले आहे. पक्ष सोडल्यानंतर चंद्र कुमार बोस म्हणाले की, आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होऊन बंगालच्या जनतेची सेवा करणार आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याला मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. पुढे म्हणाले की, त्यांना ही चूक उशिरा का होईना लक्षात आली. निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांमध्ये फूट निर्माण करणे हाच जर एखाद्या पक्षाचा एकमेव उद्देश असेल, तर ते मला मान्य नाही असा घणाघात त्यांनी केला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५२ जागांसाठी २३ एप्रिल रोजी, तर दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होईल. ४ मे रोजी मतदान पूर्ण होऊन निकाल जाहीर केला जाईल. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता, तर भाजपने ७७ जागा जिंकल्या होत्या. यावेळीही दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत अपेक्षित आहे.
