Download App

पायलटांच्या खेळीने काँग्रेसमध्ये खळबळ! गेहलोतांना बळ देण्यासाठी केला ‘हा’ प्लॅन

Rajasthan Politics : राजस्थानात मागील चार वर्षांपासून सुरू असलेला (Rajasthan Politics) गेहलोत विरुद्ध पायलट राजकीय वाद आता टोकाला पोहोचला आहे. हा वाद मिटवण्याचे प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने मध्यंतरी केले होते. मात्र, हे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. कारण, सचिन पायलट (Sachin Pilot) अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पायलट नवा राजकीय पक्ष स्थापन करू शकतात अशीही चर्चा आहे.

आज म्हणजेच 11 जून रोजी पायलट नव्या पक्षाची घोषणा करतील अशी चर्चा राजस्थानच्या राजकारणात सुरू आहेत. मात्र, काँग्रसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पायलट यांचे मन वळवले आहे. यानंतरच एकत्रित निवडणुका लढण्यावर सहमती झाली आहे.

‘राहुल गांधी दहशतवादी लादेनसारखी दाढी ठेवतात….’,भाजप नेत्याच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड

वेणुगोपाल म्हणाले, आम्ही सचिन पायलट यांच्या संपर्कात आहोत. दिल्ली येथील बैठकीनंतर तीन ते चार वेळेस पायलट यांच्याबरोबर बोलणे झाले आहे. राजस्थानात अशा प्रकारे कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचा दावा त्यांनी केला.

तोंडावर आलेल्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेस हा वाद लवकरात लवकर मिटविण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे पायलट मात्र मागे हटण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत नेतृत्वाचे असे प्रयत्न आहेत की कोणत्याही परिस्थितीत पायलट यांना राजी करायचे. यासाठी एक फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. पायलट यांना राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याचा काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसने यासाठी तयारी पूर्ण केली आहे. यामुळे पायलट आणि गेहलोत यांच्यातील वाद थांबेल तसेच पायलट नवीन पार्टी स्थापन करण्याच्या विचारांपासून परावृत्त होतील.

गेहलोतांवर पायलटांचे टीकास्त्र 

दरम्यान, आज सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त राजस्थानातील भंडाना येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार प्रहार केले. पायलट म्हणाले, जर आम्ही गरीब लोकांची मदत करायला गेलो तर केंद्रातील नेते म्हणतात अशाने तिजोरीने खडखडाट होईल येथील लोक म्हणतात युवकांची मदत केली तर मानसिक दिवाळखोरी ठरेल. जर आम्ही काही मागणी करत असू तर ती फक्त नागरिकांसाठीच आहे.

काँग्रेसचा आरएसएसशी पंगा! विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांतील ‘तो’ धडा वगळणार?

Tags

follow us