रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Putin) यांच्यात आज द्विपक्षीय संबंधांवर बैठक झाली. यावेळी दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धावर पंतप्रधान मोदींनी भारताची भूमिका मांडली. ‘भारत या युद्धात तटस्थ नाही, तर आम्ही शांततेच्या बाजूने आहोत’ असं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं. मी अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा करत असताना आमची ही भूमिका वेळोवेळी मांडत आलो आहे, असंही ते म्हणाले.
दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जगाने आता शांततेच्या मार्गावर परतले पाहिजे. आम्ही शांततेच्या हरऐक प्रयत्नांना पाठिंबा देऊ. युक्रेन संघर्षात भारत तटस्थ नाही. भारत शांततेच्या बाजूने आहे. भारत-रशिया संबंध अधिक दृढ होऊन त्याने नवी उंची गाठायला हवी असं मत त्यांनी यावेळी मांडलं. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या भूमिकेबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आभार व्यक्त केलं. तसंच युक्रेन संघर्षात भारत शांततेसाठी आग्रही असल्याच्या भूमिकेचे स्वागत केलं.
पुतिन यावर काय म्हणाले?
पंतप्रधान यांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलत असताना, राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले, युक्रेनच्या विषयासंबंधी काय घडत आहे, याबद्दल बोलण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. या संघर्षातून शांततापूर्ण तोडगा निघावा यासाठी आम्ही अमेरिकेसह जागतिक भागीदारांशी चर्चा करत आहोत. त्यातून काही संयुक्त पावले उचलली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पद स्वीकारल्यापासून गेल्या ११ वर्षात त्यांची पुतिन यांच्याबरोबर १९ वेळा भेट झाली आहे.
भारत आणि रशिया यांच्यात फार पूर्वीपासून अनेक आघाड्यांवर सौहार्दपूर्ण संबंध राहिले होते. पंतप्रधान मोदींनी भारताचे हे परराष्ट्र धोरण कायम राखलं. चार वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धामुळे व्लादिमीर पुतिन जागतिक पातळीवर एकटे पडले होते. पश्चिमेकडील देशांनी रशियावर व्यापारी निर्बंध लादले होते. मात्र, भारताने रशियाशी संबंध जपले. एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प युक्रेन-रशिया संघर्ष संपविण्यासाठी मध्यस्थी करत असतानाच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा होत आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
#WATCH | In his meeting with Russian President Vladimir Putin, PM Narendra Modi says, "Whenever I had an interaction with the world leaders, in detailed discussions, I always said that India is not neutral. India has a side and that side is of peace. We support all efforts for… pic.twitter.com/mYwZQC3Pk6
— ANI (@ANI) December 5, 2025
