पश्चिम बंगाल, आसाम, पद्दुचेरी भाजपमय! ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
निवडणुकीत भाजपाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये पुन्हा एकदा विजय संपादन केला आहे.
आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, पुद्दुचेरी या एकूण पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने (BJP) महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये पुन्हा एकदा विजय संपादन केला आहे. त्यासोबतच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा गड भेदत भाजपाने निवडणूक जिंकली आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे, निवडणूक आयोगाचे आभार मानले. आम्ही आता पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी या ठिकाणी विकासासाठी कटिबद्ध राहू, असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत.
मी भाजपाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कमाल केली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नवा इतिहास रचला आहे. भाजपा पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी अध्यक्षपद सांभाळल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यांचं भाजपाच्या कार्यकर्त्यांना अमूल्य असं मार्गदर्शन लाभलं. आज पोटनिवडणुकीचा निकालही चांगला लागला आहे.
महाराष्ट्र, नागालँड, त्रिपुरा येथील पोटनिवडणुकीत जनतेने आपल्या उमेदवारांना आशीर्वाद दिले. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मोठा विजय झाला आहे. या सर्वच राज्यांतील जनतेचे मी आभार मानतो, असंही मोदी म्हणाले. तसंच, विजय आणि पराभव हा लोकशाहीतील एक स्वाभाविक भाग आहे. परंतु पाच राज्यांतील जनतेने भारत मदर ऑफ डेमोक्रेसी आहे, पूर्ण जगाला दाखवून दिलंय. आज फक्त लोकशाहीच नव्हे तर भारताचे संविधानही विजयी झाले आहे आज देशातील संवैधानिक संस्था, लोकशाही प्रक्रियेचा विजय झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये 93 टक्के मतदान झाले आहे. हा एक नवा इतिहास आहे. आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळम या ठिकाणीही मतदानाचा नवा विक्रम स्थापित झाला. या ठिकाणी महिला मतदारांची संख्या लक्षणीय राहिली. मी आज निवडणूक आयोग, निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी, मतदान प्रक्रियेत सहभागी असणारे कर्मचारी, सुरक्षाबल यांचे मी अभिनंदन करतो, असेही मोदी यावेळी म्हणाले आज गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुललेले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यात आता भाजपाचे सरकार आहे.
मित्रांनो 2013 साली भारतीय जनता पक्षाने मला पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दिली. मी काशीमध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की मला गंगामातेने बोलावले आहे, असे म्हणालो होतो. गंगा मातेचे आपल्यावर आशीर्वाद आहेत. आपल्यावर कामाख्या देवीचे आशीर्वाद आहेत. आसाममध्ये तेथील मतदारांनी सलग तिसऱ्या वेळी भाजपा, एनडीएला मतं दिली आहेत, असं म्हणत आता आम्ही विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे आश्वासन जनतेला दिले.