Friendship Day 2026: आरबीजी फाऊंडेशनने थेट बांधावर जात विणला ‘मैत्री दिना’चा धागा…

Friendship Day 2026: RBG फाऊंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे यांनी शेतीत जाऊन 500 महिलांना रेनकोट देऊन, अनोखा ‘मैत्री दिन’ उत्साहात साजरा केला.

  • Written By: Published:
RBG FOUNDATION

Friendship Day 2026: नव्या ‘लाइफस्टाईल’मध्ये मैत्री दिन धडाक्यात साजरा होत असतानाच, या आणि अशा उत्सवाची पुसटशीही कल्पना नसलेल्या आणि रोज केवळ 10-12 तास डोंगरदऱ्यांत, रानावनात, ऐन पावसात भात लावणी करणाऱ्या, शेतीत राबराब राबणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी रविवारी आयुष्यातील पहिलावहिला मैत्री दिन अनुभवला! हा क्षण पाहून भारावलेल्या महिला शेतकऱ्यांनी बांधावर एकत्र येत खरोखरीच मैत्री दिन फुलविला..

या साऱ्याचे निमित्त ठरले, ते नवी मुंबईतील ‘आरबीजी फाऊंडेशन’ने (RBG Foundation) ‘फ्रेंडशिप डे’चे औचित्य साधून हाती घेतलेल्या ‘चला बांधावर जाऊ, महिला शेतकऱ्यांना बळ देऊ’! या उपक्रमाचे! फाऊंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे यांनी शेतीत जाऊन 500 महिलांना रेनकोट देऊन, अनोखा ‘मैत्री दिन’ उत्साहात साजरा केला.

शेतकरी हा पोशिंदा आहे. प्रतिकूल हवामानातही तो शेतात राबून समाजाच्या अन्नाची गरज पूर्ण करतो. त्याच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी महिलांना बांधावर जात रेनकोट देण्यात आले.

पावसाने जोर धरल्याने सध्या भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. पावसाचा जोर किती आणि कसाही असला तरीही, भातलावणी थांबत नाही. या कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतकरी ऐन पावसात दिवसभर राबत असतात. पावसापासून बचावासाठी डोक्यावर काही नसले तरीही ही मंडळी आनंदाने भातलावणी करीत असतात. मात्र, अशा पावसात शेतकरी महिला भिजू नयेत, याकरिता फाऊंडेशनच्या माध्यमातून रेनकोटचे वाटप करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील कसारा परिसरातील भातलावणी करणाऱ्या महिला शेतकरी, शेतकरी बांधवांसह गोविंद तळपाडे, संतोष कचरे, राजेंद्र बागुल, मारोती काशिदे, पंकज मनोहर, जगदीश जाधव, उत्तम वाघ आदी उपस्थित होते.


महिला शेतकरी फोरम !

महिला शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महिला शेतकरी फोरम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मधुरा गेठे यांनी जाहीर आहे. महिला शेतकरी, राज्य सरकार आणि सरकारचे विविध कृषी विभाग यांना एकत्र आणून हा फोरम काम करणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचा समावेश असेल.

घर, मुलाबाळांचा सांभाळून करून महिला आता शेतीतही आघाडीवर आहेत, हे चित्र आशादायी आहे. शेतीतील कष्टातून हाती काय लागेल, याची हमी नसतानाही महिला शेतकरी प्रचंड मेहनत घेतात. त्यात पाऊस, वारा याची चिंता न करता महिला दिवस-दिवस राबत आहेत, अशा महिलांसोबत मैत्रीचे नाते जोडून सामाजिक धागा घट्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे नवी मुंबईतील आरबीजी फाउंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे यांनी सांगितले आहे.

follow us