Download App

पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाकडून पैशांचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला.

Prithviraj Chavan : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर भाजपकडून केला जात आहे असा थेट आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसंच, निवडणूक रोखे (इलेक्ट्रोल बॉन्ड) इन्कम टॅक्स याच्यासह इतर सरकारी संस्थांच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशातून भाजप हा पैसा वाटत आहे असाही घणाघात चव्हाण यांनी यावेळी केला आहे. (Prithviraj Chavan) ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

महाविकास आघाडीच जिंकणार

सध्या पूर्ण देशात मोदींच्या विरोधात लाट आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीचा मोठा विजय होणार आहे असा दावाही चव्हाण यांनी यावेळी केला. तसंच, भाजपने फक्त निवडणुकीसाठीच नाही तर सरकार पाडणे, आमदार विकत घेणे यासाठीही मोठा पैशांचा वापर केला आहे असंही चव्हाण म्हणाले. परंतु, कितीही पैसे वाटले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच जास्त जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

10 वर्षातील काही सांगायला नाही

यावेळी पंतप्रधानांच्या सभांवरूनही चव्हाण यांनी जोरदार हमला केला आहे. गेल्यावेळी म्हणजे 2019 ला मोदींनी महाराष्ट्रात सहा सभा घेतल्या होत्या. परंतु, त्यांनी यावेळी आत्तापर्यंतच 12 सभा घेतल्या आहेत म्हणजे परिस्थिती कठीण आहे असा टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे. तसंच, प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात दोन दिवस राहाव लागलं असंही चव्हाण म्हणाले. तसंच, त्यांच्याडे 10 वर्षांतील कामांबद्दल काहीच नाही सांगायला त्यामुळे ते काँग्रेसवर बोलत आहेत असंही ते यावेळी म्हणाले.

 

गर्दी नाही, पैसे देऊन लोक आणतात

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जे नाही ते मोदी बोलत आहेत असं म्हणत मंगळसुत्राबद्दल काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काहीच नाही. परंतु, मोदी त्यावरून काँग्रेसवर बोलतात. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा विषयावर बोलाव तरी का? असं म्हणत चव्हाण यांनी मोंदींचा चांगलाच समाचार घेतला. तसंच, मोदींच्या सभांना गर्दी नाही. पैसे देऊन माणसे बोलवण्याची वेळ येते असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला.

follow us