Download App

‘ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी’… खातेवाटपानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Aditya Thackeray : अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर काल या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले. खातेवाटप करताना शिंदे गटातील मंत्र्यांच्या खात्यात काही फेरबदल करण्यात आले. शिंदे गटाचा विरोध डावलून अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या गटातील अन्य मंत्र्यांनाही वजनदार खाती मिळाली मात्र शिंदे गटातील आमदारांना एक वर्षानंतरही मंत्रीपदे मिळालेली नाहीत. या वरूनच आता शिवसेनेचे आमदार (उबाठा) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. चला, अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर 13 दिवसांनी खाते वाटप झालं.. पहिले 20, नंतर 9 असा विस्तार झाला. आता या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत! त्यांची काय किंमत आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपाने 33 देशांना दाखवून दिलंय! अभिनंदन!

कोणाकडे कोणतं खातं?

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग .

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

Tags

follow us