Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे या चर्चा सुरु असतानाच शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यामध्ये बंद दाराआड बैठक झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. मात्र, या वृत्ताचं जयंत पाटील यांनी खंडन केलं आहे.
आम्हा तिघांची बंद दाराआड कोणतीही बैठक अथवा कसलीही चर्चा झालेली नाही, असं पाटील यांनी म्हटलं.
पुण्यातील साखर संकुलात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कृषी क्षेत्रातील AI तंत्रज्ञानाच्या वापराबाबत बैठक होती. हि बैठक संपल्यानंतर मी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदरणीय पवारसाहेब यांची एकत्र बैठक झाली, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या या…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 1, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सत्तेत आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट विरोधी पक्षांसोबत आहे. दरम्यान, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असा चर्चा रंगल्या आहेत. अशातच आज साखर संकुलातील बैठक संपल्यावर शरद पवार, अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार अन् अजित पवारांसोबत जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आहे. मात्र, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान, जयंत पाटील यांनी हे वृत्तांचे खंडन केले.
जयंत पाटील यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलाी. त्यात त्यांनी म्हटलं की, पुण्यातील साखर संकुलात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कृषी क्षेत्रातील AI तंत्रज्ञानाच्या वापराबाबत बैठक होती. ही बैठक संपल्यानंतर मी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदरणीय पवारसाहेब यांची एकत्र बैठक झाली, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या या बातम्या पूर्णपणे निराधार असून आम्हा तिघांची बंद दाराआड कोणतीही बैठक अथवा कसलीही चर्चा झालेली नाही, असं पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा येत्या १० जूनला २६ वा वर्धापन दिन आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.