Download App

‘आम्हाला आव्हानं देऊ नका अन्यथा..,’; जरांगेंचा भुजबळांना विनंतीवजा इशाराच

Manoj Jarange Patil On Chagan Bhujbal : आम्हाला आव्हाने देऊ नका, अन्यथा काहीही होऊ शकतं, ही तुम्हाला माझी विनंती असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना विनंतीवजा इशाराच दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. अशातच सगेसोयगे शब्दावरुन दगाफटका झाल्यास मंडल आयोग चॅलेंज करणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं. त्यावर हिंमत असेल तर चॅलेंज कराच, असं आव्हान भुजबळांनी जरांगे यांना दिलं. त्यावर बोलताना आव्हाने देऊ नका अशी विनंतीच जरांगे पाटलांनी केली आहे.

हेमंत सोरेन यांची ED कडून कसून चौकशी सुरू; अटक झाल्यास आमदारांच्या सह्यांसह प्लॅन B अन् C तयार

मनोज जरांगे म्हणाले, माझी त्यांना (छगन भुजबळ) पुन्हा विनंती आहे की, त्यांनी अशी आव्हानं देऊ नये. कारण आम्हाला गोरगरिबांचं वाटोळं करायचं नाही. कोणाच्याही मुलांचं वाटोळं करून आम्हाला आमची पोरं मोठी करायची नाहीत. आम्हीसुद्धा पुराव्यांशिवाय बोलत नाही. मला असं वाटतं की, महाराष्ट्रातल्या ओबीसींनी भुजबळांना समजून सांगावं, तुमच्या राजकीय स्वर्थासाठी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करू नका. भुजबळांना ओबीसींची काळजी नाही. त्यांना केवळ त्यांचा राजकीय स्वार्थ महत्त्वाचा असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

बिग बॉस 17 मधून बाहेर पडताच अंकिताला मोठी ऑफर; ऐतिहासिक चित्रपटात साकारणार भूमिका

तसेच मी मागे एकदा भुजबळांना धनगर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. अद्याप त्यांनी त्याबाबतची भूमिका भूमिका स्पष्ट केलेली नाही. ओबीसीत १२ बलुतेदार जाती आहेत, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू दिला जात नाही. त्यामुळे त्यांनी मागणी केली आहे की ओबीसीत त्यांचा वेगळा प्रवर्ग तयार करावा. आमचा त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी आमची मागणी आहे. छगन भुजबळ अशी आव्हानं देऊन आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सगळं आरक्षण घालवून बसतील. मी त्यांना इतकंच सांगेन की, उगाच आम्हाला आव्हान देऊ नका, अन्यथा काहीही होऊ शकतं, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. सरकारच्या निर्णयावर ओबीसी नेत्यांनी प्रचंड टीका केली होती. राज्य सरकारने अधिसूचना काढून ओबीसी आरक्षणाला धक्का लावलाच असे छगन भुजबळ म्हणाले होते. या अधिसूचनेवर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या आहेत. तेव्हा आता हरकती नोंदवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोगाच्या विरोधात आवाज द्यावा, असे आव्हान भुजबळ यांनी दिले.

follow us