Nilesh Lanke Criticized Kashinath Date In Parner : पारनेर बसस्थानकाच्या नवीन इमारतची आपण सर्वात प्रथम चार साडेचार वर्षांपूर्वी, मार्च 2020 मध्ये तत्कालीन परिवहन मंत्र्यांकडे मागणी केली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा (Maharashtra Politics) केला. इमारतीच्या कामाला मंजुरी मिळवली असे असताना विरोधक म्हणतात की, आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका. जे काम मी आणले, त्यांचे भूमिपूजन मीच करणार ना, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची मला गरजंच काय? असा सवाल करीत खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विद्यमान आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांच्यावर निशाणा साधला.
पारनेर बसस्थानक इमारतीच्या 2 कोटी 66 लाख रूपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. लंके म्हणाले, आमदार म्हणून मी सकारात्मक काम केले. त्यामुळेच हजारो कोटी रूपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळेच तालुका विकासात अग्रेसर असल्याचे चित्र आहे. मतदारसंघात मी प्रामाणिक काम केले म्हणूनच मतदारांनी मला लोकसभेत पाठविल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.
खासदार लंके म्हणाले, पारनेर बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मी आमदार झाल्यापासून बसस्थानकासाठी माझा पाठपुरावा सुरू होता. आज या कामाचा शुभारंभ होतोय याचा आनंद आहे. नव्या बसस्थानकामुळे पारनेरचा चेहरा मोहरा बदलणार आहे. बस स्थानकाच्या कामाचे कोणी श्रेय घेतले, तर जनतेला ते कसे पटेल? काल आलेले विरोधक आम्ही काम मंजूर केले असल्याचे सांगत आहेत. विकास कामांसाठी ठराविक प्रक्रिया असते, त्यासाठी मी सन 2020 पासून पाठपुरावा केला. आज या कामाचे भूमिपूजन करताना आनंद होत असल्याचे सांगतच खासदार नीलेश लंके यांनी विरोधकांना टोला लगावला.
विधानसभेचा निकाल कसा लागला आहे, हे सर्वांना माहीती आहे. पूर्वी राजकीय लोक ईव्हीएमवर संशय घेत होते. आज शेतामधील भगिनीही ईव्हिएमवर अविश्वास व्यक्त करत आहे. राज्यात सरकार आल्यावर वेगळा उत्साह असतो, तो दिसला का? असा प्रश्न उपस्थित करत ईव्हीएमच्या जोरावरील विजय टिकणारा नसतो. ज्यांनी निवडणूक सोडली त्यांच्या तोंडात या निवडणूकीत जांभुळ पडल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी निवडणूकीच्या निकालावरही भाष्य केलंय.
समाजातील दुर्लक्षीत घटकांसाठी काही केलं पाहीजे, यासाठी नीलेश लंके प्रतिष्ठान काम करते. दिव्यांग संघटनेचे सुनिल करंजुले यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी एक योजना हाती घेण्यात आली आहे. शासन दिव्यांगांना हजार-दिड हजारांची मदत करते. आमच्या योजनेतून दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर उभे करण्यात येणार आहे. वर्षभरात 500 दिव्यांगाना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे उद्दीष्ट असल्याचे खासदार लंके यांनी यावेळी सांगितले.
मला दिल्ली मिरवायला पाठविले नाही!
कांदा, दूध शेतमालाच्या प्रश्नावर आवाज उठविला. दूध प्रश्नावर आवाज उठविला. गेल्या आठवडयात सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी दिल्लीत मंत्र्यांना पत्र दिले आहे. सोमवारी दिल्लीत गेल्यानंतर या प्रश्नावर संसदेच्या पायरीवर आंदोलन करणार आहे. मुदतवाढ झाली नाही, तर मलाच तुरूंगात डांबा अशी भूमिका मी घेणार आहे. मला तुम्ही दिल्ली मिरवायला नाही पाठवविले, तुमचे प्रश्न मांडण्यासाठी पाठविले असल्याचे खासदार लंके म्हणाले.