Download App

Sanjay Raut : वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नव्हता ना? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

जोपर्यंत शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाहीत अशी घोषणा कोणी केली?, राऊतांचा फडणवीसांना टोला

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एक विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही. काँग्रेसने (Congress) आजवर आम्हाला चुकीचे शिकवले आहे. त्यांनी माफी मागावी, असे फडणवीस म्हणाले. त्यावरून संजय राऊतांन (Sanjay Raut) फडणवीसांवर जोरदार टीका केली. जोपर्यंत शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाहीत ही घोषणा कोणाची होती? अशा शब्दात राऊतांनी फडणवीस यांना टोला लगावला. तु्म्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे भक्त असाल, तर बेळगाव कारवायावर तुमची भूमिका काय, हे स्पष्ट करा असं आव्हानही राऊतांनी दिलं.

फडणवीस शेवटच्या पेशव्याचे उत्तराधिकारी, ते शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू…; संजय राऊतांची जहरी टीका 

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी फडणवीस यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. हे भाजपचे लोक चिंतन बैठका खूप घेतात. एकदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचे शौर्य आणि संघर्ष यावर चिंतन बैठक बोलवावी. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, असे विधान त्यांनी केले. यावरून त्यांना या संदर्भात इतिहासाचे ज्ञान नसल्याचे सिद्ध होते. महाराजांनी सुरत का लुटली? हे त्यांनी माहिती करून घ्यावे. सुरत येथील व्यापारी मंडळ ईस्ट इंडिया कंपनीला स्वत:च्या सुरक्षेसाठी खंडणी देत होते. त्यांचे कृत्य स्वराज्याच्या विरोधात होते. त्यामुळं त्यांनी सुरतेवर हल्ला केला. राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्यांनी हे केले, असं राऊत म्हणाले.

Bigg Boss Marathi: घरात ज्याचा खेळ नाही दमदार, तो सरळ बनणार रद्दीचा भार! कोण होणार नॉमिनेट? 

पुढं ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटलांसोबत अन्य लोक होते. त्यावेळी मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचं काम हे भाजपचे गुंड करत होते. तुम्ही त्यांचे समर्थक आहात. पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे तुमचे गुंड, तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार आहात का? तुम्हाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून विदर्भ वेगळा करणारे तुम्हीच आहात. हे तुमच्या मनात आहे की नाही? जोपर्यंत शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाहीत अशी घोषणा कोणी केली? तुम्ही शिवाजी महाराजांचे खरे भक्त असाल तर बेळगाव कारवायावर तुमची काय भूमिका आहे, हे स्पष्ट करा, असं राऊत म्हणाले.

फडणवीस पेशव्याचे उत्तराधिकारी
शेवटचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी शिवाजी महाराजांचे साम्राज्य लयास नेले. त्यांनी सर्वप्रथम पुण्यातील शनिवारवाड्यात ब्रिटीश युनियन जॅक फडकावला. फडणवीस हे त्या पेशव्याचे उत्तराधिकारी आहेत. त्याशिवाय त्यांनी अशी भाषा केली नसती. तुम्ही मालवणमधील पुतळा तोडला हे तुमचे पाप आहे. त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणारे मोकाट फिरत आहेत. तुम्ही त्यांना अटक केली नाही. कारण ते तुमच्या पेशवाईचे शिलेदार आहेत. फडणवीस हे शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहेत, अशी जहरी टीका राऊतांनी केली.

follow us