Download App

‘शिरुरची लोकं हुशार, एकदाच तिकीट घेतात नाटक फ्लॉप निघालं तर..’ फडणवीसांचे कोल्हेंना खोचक टोले

लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही.

Devendra Fadnavis Criticized Amol Kolhe : आढळरावांपेक्षा एका गोष्टीत ते (अमोल कोल्हे) सरस आहेत. आढळराव नाटककार नाहीत. आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही. ते एवढे नाटकी आहेत. त्यांना रडता येतं हसता येतं. बोलता येतं. जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा हे मी त्यांना सुद्धा सांगतो. लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही. शिरुरच्या जनतेनं एकदा तिकीट घेतलं आहे.

आढळरावांवर पक्षांतराचा आरोप केला जातो पण, समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी कितीवेळा निष्ठा बदलल्या? पाच वर्षात किती वेळा फेसबूक पोस्ट टाकल्या? किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते? कसे कसे थांबले? याचं सत्य आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा उघडा होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना खोचक टोले लगावले.

भाजपने तोडली सातारा अन् शिरुरची रसद : पवारांच्या शिलेदारांची मुंबईतून कोंडी 

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील याच्या प्रचारार्थ शिरुर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्यासह महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. यावेळी फडणवीसांनी आढळरावांना तिकीट कसं मिळालं याचाही खुलासा केला. ते म्हणाले, मी,अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र बसलो. जागावाटपात शिरुरची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली.

या जागेसाठी शिवसेनेचाही आग्रह होता. मी मधला मार्ग काढला. अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना सांगितलं सीट जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असली तरी उमेदवारी आढळरावांना देऊ म्हणजे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल. त्यामुळे त्यांनी पक्ष बदललेला नाही आम्ही तिघे एक विचाराने एकत्र आलो आहोत. आम्ही ठरवून हे केलं पक्ष बदलला असं काही नाही, असे फडणवीस म्हणाले.

“खासदार साहेब पाच वर्ष कुठं होता?” मतदारांचा सवाल; शिरुरमध्ये रंगलय बॅनर पॉलिटिक्स!

शिरुरची लोकच जबरदस्त, फडणवीसांचं सर्टिफिकेट

शिरुरची लोकं खरंच हुशार आहेत. मी पाहिलं पाच वर्ष हा गडी फिरकला नाही. आता ते गावोगावी जातात. लोकंही बोलावतात स्वागत करतात, हार घालतात. समोरच्यालाही वाटतं वा.. काय स्वागत केलं अन् नंतर लोकं हळूच विचारतात पाच वर्षे कुठे होता सांगा. खरंच जबरदस्त लोकं आहेत तु्म्ही असे फडणवीसांनी म्हणताच सभेतील लोकांनीही त्यांना हसून दाद दिली.

follow us